नाशिक – नवनिर्वाचित केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ भारती पवार यांनी नुकतीच नाशिकमधील उद्योजक व व्यापारी वर्गाशी संवाद साधत नाशिक जिल्ह्यातील उद्योजक व व्यापारी वर्गाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. मागील दशकापासून नाशिक जिल्ह्याचा विकास सर्वस्तरावरून मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यानुसार इतर पायाभूत सुविधाही ह्या प्रत्येक उद्योजक, व्यापार व शेतकरी वर्गासाठी मिळणे अपेक्षित असल्याने उद्योजक व व्यापारी वर्गांनी डॉ. पवार यांच्याशी संवाद साधत नाशिक जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी अपेक्षित असलेल्या पायाभूत सुविधांची माहिती दिली.
यावेळी उपस्थित उद्योजक व व्यापा-यांनी केलेल्या मागणी नुसार नाशिकच्या विकासासाठी कायमस्वरूपी प्रदर्शन केंद्र सुरु करण्यासाठी केंद्रीय पातळीवरून करण्याचा प्रयत्न करण्यात येईल, जेणे करून उद्योजक व व्यापारी वर्गाला त्यांच्या दर्जेदार उत्पादनाची माहिती या केंद्राद्वारे देता येईल, याचबरोबर जीएसटी व इनकम टॅक्स बाबत असलेल्या अडीअडचणीं बाबत वेळोवेळी उद्योजक व व्यापारी वर्गाच्या संपर्कात राहुन अडचणीचे समाधान तात्काळ कशा सोडविता येतील. याबाबत प्रयत्न करण्याचे आश्वासन यावेळी दिले. नाशिकमधील उद्योजक मोठे उद्योग नाशिकमध्ये येण्यासाठी अनेक दिवसांपासून वाट बघत आहे असे उद्योग नाशिकमध्ये आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती देत, मोठे उद्योग नाशिकमध्ये आल्यास नक्कीच अनेक लघु उद्योजकांच्या व्यवसायाच्या संधीबरोबरच रोजगाराच्या संधी निर्माण होतील. तसेच येणारे इंडस्ट्रियल बिलमध्ये उद्योजक व व्यापारी वर्गाच्या विकासाच्या दृष्टीने अनेक मुद्दे समाविष्ट करणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
यावेळी केंद्रीय मंत्री डॅा. पवार यांनी कामगार कायदा हा उद्योजकांबरोबरच कामगारांच्या हिताच्या दृष्टीने कशा पद्धतीने सोयीचा करता येईल याबाबत नक्कीच संबधित खात्याच्या मंत्र्यांसमवेत चर्चा करणार असल्याचे सांगितले. सर्वात महत्वाचे म्हणजे शेतकरी वर्गाच्या कल्याणासाठी केंद्रीय मंत्रालयाकडे असलेल्या योजनांची सखोल माहिती ही जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहचविण्यासाठी व या योजनांचा प्रत्यक्ष फायदा शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी नाशिक जिल्हा औद्योगिक, शेती व व्यापाराच्या दृष्टीने कशा पद्धतीने विकास करत आहे तसेच नाशिकमधील उद्योजक, कामगार, शेतकरी व व्यापारी वर्गाचे असलेले कौशल्य नाशिकला कशा पद्धतीने पुढे नेत आहे याची माहिती केंद्रीय पातळीवर मांडून नाशिकच्या पायाभूत सुविधा अधिक बळकट करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. याचबरोबर नाशिककरांसाठी एअर कनेक्टीव्हनिटी जलतगतीने होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे व उद्योजक व व्यापारी यांची एक समन्वय समिती स्थापून नाशिकच्या विकासाच्या दृष्टीने तिमाही सर्वांसमवेत चर्चा करणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. नाशिकच्या विकासाच्या दृष्टीने ड्राय पोर्ट सुरु करण्याचे प्रयत्न सुरु असून लवकरच हे ड्राय पोर्ट सर्वांसाठी खुले होणार असल्याची माहिती माजी पर्यटन मंत्री महाराष्ट्र राज्य जयकुमार रावल यांनी सांगितले. यावेळी माजी पर्यटन मंत्री महाराष्ट्र राज्य जयकुमार रावल, गिरीश पालवे, आशिष नहार, प्रदीप पेशकर, लक्ष्मण सावजी, उद्योजक धनंजय बेळे, सतीश कोठारी, राजेंद्र आहिरे, सोनल दगडे, रत्नाकर शेट्टी, प्रफुल्ल संचेती आदी उद्योजक व व्यापारी उपस्थित होते.