इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
शिवसेना- मनसेच्या युतीची चर्चा सुरु असतांनाच आज मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी पक्षाच्या उपाध्यक्षांची बैठक बोलावली आहे. मुंबईतील शिवतीर्थ येथे ही बैठक पार पडेल. त्यामुळे राज ठाकरे पदाधिका-यांना कोणता संदेश देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शुक्रवारी उध्दव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते होणार, आता संकेत देणार नाही, थोड्या दिवसात बातमीच देतो असे थेट विधान केले. शिवसैनिकांच्या मनात कोणताही संभ्रम नाही, त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मनातही कोणताही संभ्रम नाही असे ते म्हणाले होते. त्यानंतर मनसेची ही बैठक होणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून मनसे – शिवसेना युतीबाबत सकारात्मक विधाने येत आहेत. त्यात अनेकांचे सूचक वक्तव्यही समोर आले. पण, त्यावर थेट चर्चा होत नाही. त्यामुळे राज ठाकरे यांच्या बैठकीत काय निर्णय होतो. हे महत्त्वाचे आहे. काल उध्दव ठाकरे यांनी युतीसंबधी जे बारकावे असतील त्यावर आम्ही काय करायचे ते पाहू असेही ते म्हणाले. या विधानावर मनसे नेते अविनाश देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली. ज्यावेळी आमच्याकडे युतीचा ठोस प्रस्ताव येईल त्यावेळी त्यावर राज ठाकरे निर्णय घेतील. तर संदीप देशपांडे यांनी सांगितले की ते काय बातमी देणार याची वाट पाहू.
तर दोन दिवसापूर्वी मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांनी दोन्ही भाऊ एकत्र आले तर मला काही प्रॅाब्लेम नाही. मात्र त्यांची इच्छा असेल तर त्यांनी फोन करावा. दोघांकडे एकमेकांचे नंबर आहे. आम्ही बोलून काही फरक पडणार नाही. दोन भावांनी एकत्र यावे हे त्यांनी ठरवावे. राज ठाकरे यांची इच्छा असेल ती माझी इच्छा. पुढाकार कोणी घ्यावा हे त्यांनी ठरवावं, आम्ही बोलून काही उपयोग नाही असे त्यांनी सांगितले.
त्यानंतर शुक्रवारी खा. संजय राऊत यांनी दोघांचे फोन झालेही असेल असे सांगत संकेत दिले. त्यानंतर उध्दव ठाकरे यांचे विधान आले. त्यामुळे राज ठाकरे व उध्दव ठाकरे यांचा फोन झाल्याची चर्चाही सुरु झाली. त्यानंतर राज ठाकरे यांनी आज बैठक बोलावली आहे. आता त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.