नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दिंडोरी येथील श्री स्वामी समर्थ केंद्राचे प्रमुख गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे (श्रीराम खंडेराव मोरे) यांनी कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याची तक्रार केंद्राच्याच सेवेकऱ्यांनी केली आहे. त्र्यंबकेश्वर येथे साकारण्यात आलेल्या स्वामी समर्थ गुरुपीठात तब्बल ५० कोटी रुपयांचा घपला झाल्याचे सेवेकऱ्यांचे म्हणणे आहे. याप्रकरणी सेवेकरी अमर पाटील यांच्यासह अन्य सेवेकऱ्यांनी थेट पोलिस अधिक्षकांकडे धाव घेतली आहे. तसेच, यासंदर्भात सविस्तर तक्रारही देण्यात आली आहे. पोलिसांनी ही बाब गांभिर्याने घेतली असून त्याची चौकशी सुरू केली आहे.
धुळे येथील सेवेकरी अमर पाटील यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्र्यंबकेश्वररोडलगत असलेली अखिल भारतीय स्वामी समर्थ गुरुपीठ ही एक धर्मदाय संस्था आहे. या संस्थेचे अध्यक्ष श्रीराम खंडेराव मोरे हे आहेत. या संस्थेचे सर्व पदाधिकारी म्हणजेच उपाध्यक्ष नारायण दामोदर काकड, सचिव चंद्रकांत श्रीराम मोरे, उपसचिव नितीन श्रीराम मोरे, सदस्य अनिल खंडेराव मोरे, शिरीष त्र्यंबक मोरे, निंबा मोतीलाल शिरसाट यांनीच हा अपहार केला आहे. या घोटाळ्याची एकूण किंमत ५० कोटी ६८ लाख ६९ हजार २२१ रुपये एवढी आहे. या धर्मदाय संस्थेचा निधी राष्ट्रीयकृत बँकेत ठेवणे कायद्यानुसार सक्तीचे आहे. मात्र, गुरूपीठाच्या पदाधिकाऱ्यांनी संगनमताने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी १ कोटी ४४ लाख ९३ हजार ५६० रुपयांचा निधी बँकेत जमा केला नाही. तर, तो विविध कारणांसाठी वापरुन हे पैसे हडपले आहेत.
तक्रारीत पुढे नमूद करण्यात आले आहे की, धर्मदाय संस्थेत ५ हजार रुपयांपेक्षा जास्त रकमेचे काम करण्यासाठी कलम ३६ नुसार धर्मदाय आयुक्तांची परवानगी घेणे आवश्यक असते. तसेच त्या कामांच्या निविदा काढणे गरजेचे असते. मात्र, २००९ ते २०२१ पर्यंत वेळोवेळी विविध कामांच्या माध्यमातून पैशांचा अपहार झाला आहे. २०१६ ते २०१७ या आर्थिक वर्षात ९ कोटी २१ लाख ७० हजार ६८५ रुपये स्थावर मिळकतीवर तर १० हजार २०० रुपयांचा खर्च जंगम मिळकतीवर करण्यात आला आहे. एकूण रक्कम रुपये ९ कोटी २१ लाख ८० हजार ८८५ रुपये एवढ्या निधीचा अपहार करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
दाखल तक्रारीनुसार, २०१७ ते २०१८ या आर्थिक वर्षात ५ कोटी ७३ लाख १८ हजार २७१ रुपयांचा स्थावर मिळकतींवर खर्च करण्यात आला, ४७ लाख ६९२ रुपयांचा खर्च जंगम मिळकतींवर केला आहे. याच काळात २४ लाख ६२ हजार ६५१ रुपये अनामत अॅडव्हान्स म्हणून देण्यात आली आहे. असा एकूण ६ कोटी ४४ लाख ९९ हजार ६४१ रुपये एवढ्या निधीचा अपहार केला आहे. २०१८ ते २०१९ या वर्षात ९कोटी ५लाख ६५ हजार ३०८ रुपये इतका खर्च स्थावर मिळकतीवर आणि रक्कम रुपये २ कोटी ६३ लाख ४४ हजार ८७८ रुपये जंगम मिळकतींवर खर्च केला आहे. या काळात १ कोटी ४७ लाख ३३ हजार ८७८ रुपये अॅडव्हान्स म्हणून इतरांना दिला आहे. २०१९ ते २०२० या आर्थिक वर्षात १० कोटी ३० लाख ५८ हजार ९२० रुपये खर्च स्थावर मिळकतींवर ४४ लाख २२ हजार ३७ रुपये जंगम मिळकतीवर खर्च केला आहे, असे तक्रारीत नमूद केले आहे.
पाटील यांनी तक्रारीत म्हटले आहे की, २ कोटी ७९ लाख ६० हजार ८७३ रुपये अॅडव्हान्स म्हणून देण्यात आला आहे. अशाप्रकारे यावर्षी १३ कोटी ५४ लाख ४१ हजार ८३० रुपये एवढ्या निधीचा अपहार केला आहे. २०२० ते २१ या काळात ४ कोटी ८६ लाख २४ हजार १२८ रुपये स्थावर मिळकतींवर आणि रक्कम रुपये १३ लाख ११ हजार ४१ रुपये जंगम मिळकतीवर खर्च केले आहेत. याच कालावधीत १ कोटी ८६ लाख ६८ हजार ९९ रुपये इतरांना अॅडव्हान्स म्हणून देण्यात आलेले आहे. अशी एकूण ६ कोटी ८६ लाख २६८ एवढ्या मोठ्या रकमेचा अपहार केला आहे. २००९ पासूून २०२१ पर्यंत ५० कोटी ६८ लाख ६९ हजार २२१ रुपयांचा अपहार करुन मोठ्या प्रमाणात फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी चौकशी करुन संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी पाटील यांनी केली आहे.
दरम्यान, याप्रकरणी गुरुपीठाच्यावतीने सांगण्यात आले आहे की, संस्थानचे कामकाज नियमानुसार सुरू असून तक्रारीत कुठलेही तथ्य नाही. तर, पोलिस अधिक्षक सचिन पाटील यांनी सांगितले आहे की, याप्रकरणी आम्ही धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून आम्ही अहवाल मागविला आहे. हा अहवाल पाहून पुढील कार्यवाही करण्यात येईल.