दिंडोरी : राज्यातील साखर कामगारांचे गेले दोन अडीच वर्षांपासून प्रलंबित पगारवाढ प्रश्न अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मध्यस्तीने अखेर सुटला असून बारा टक्के वेतनवाढीसह विविध भत्यामध्ये वाढ करण्याचा निर्णय नुकताच झालेल्या त्रिपक्षीय समितीच्या बैठकीत झाला आहे. साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांचे अध्यक्षतेखाली साखरे संकुल(पुणे) येथे नुकत्याच झालेल्या त्रिपक्षीय समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
बैठकीत बारा टक्के वेतनवाढीसह विविध भत्यामध्ये वाढ देऊन त्याची अंमलबजावणी एप्रिल 2019 पासून करण्याचा निर्णय घेण्यात आला. या अंतरिम पगारवाढ ऐवजी थेट पगारवाढीच्या निर्णयामुळे राज्यातील दीड लाख साखर कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण असून गणपती बाप्पा पावला असल्याची प्रतिक्रिया साखर कामगारांनी व्यक्त केली आहे. साखर कामगारांच्या वेतनवाढीच्या प्रलंबित प्रश्नांबाबत त्रिपक्षीय समितीच्या अनेक बैठक झाल्या होत्या मात्र निर्णय होत नव्हता अखेर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मध्यस्ती करत सर्वसमावेशक तोडगा काढला आहे.नाशिक जिल्ह्यातर्फे साखर संघाचे उपाध्यक्ष,कादवाचे अध्यक्ष तथा त्रिपक्षीय समिती सदस्य श्रीराम शेटे व कामगार प्रतिनिधी डी. डी. वाघचौरे यांनी चर्चेत भाग घेत महत्वपूर्ण भूमिका बजावली.
मार्च २०१९ च्या मूळ पगार,महागाई भत्यासह स्थिर भत्यावर १२ टक्के वेतनवाढ व इतर भत्यावर १२ टक्केप्रमाणे वाढ देण्यात आली आहे, महागाई भत्ता निर्देशांक २.७० वरून २.९० करण्यात आला आहे.सहा वर्षे सेवा झालेल्यांना एक वार्षिक वेतनवाढ तर १२ वर्ष सेवा झालेल्यांना दोन व १८ वर्ष सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांना तीन तर २४ वर्ष सेवा झालेल्यांना चार वार्षिक वेतन वाढ मिळणार आहेत या बैठकीस साखर कामगारांचा प्रलंबित प्रश्न सोडविल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार,त्रिपक्षीय समितीचे सर्व सदस्य यांचे कादवा कारखान्याचे संचालक,सभासद, खातेप्रमुख आणि कामगार युनियनचे पदाधिकारी व सर्व सदस्य यांनी आभार मानले आहे.