नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– आत्मा ते परमात्मा या अंतर्मुख प्रवासात “ध्यान”, “मौन” आणि “आत्मचिंतन” यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. या आत्मिक साधनेचा अनुभव अधिक सखोल व प्रभावी व्हावा यासाठी नाशिकजवळील अंजनेरी येथे पासग विहार फाउंडेशन तर्फे एक भव्य ध्यान केंद्र उभारले जात आहे. साडेबारा एकराच्या विस्तीर्ण परिसरात साकार होणाऱ्या या केंद्राचा शिलान्यास सोहळा नुकताच संपन्न झाला.

जैन समाजाच्या पुढाकाराने साकारत असलेले हे केंद्र सर्व धर्मीयांसाठी खुले असून, सर्वसामान्यांनाही आत्मशांती व अंतर्मुखता साधता यावी, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.
पौराणिक काळापासून अंजनेरीला ध्यानासाठी विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. श्री हनुमानांच्या जन्मापूर्वी त्यांच्या माता अंजनी यांनी याच स्थळी तपश्चर्या केली होती. अंजनेरीच्या डोंगररांगांमध्ये अनेक प्राचीन गुहा असून, त्या ध्यानधारणेची साक्ष देतात. विशेष म्हणजे, येथील एका गुहेमध्ये अडीच लाख वर्ष जुनी भगवान शांतिनाथांची मूर्ती आजही अस्तित्वात आहे.
या ऐतिहासिक, धार्मिक आणि नैसर्गिक वारशामुळे अंजनेरीची निवड ध्यान केंद्रासाठी करण्यात आली आहे. केंद्राच्या उभारणीत पर्यावरणस्नेही दृष्टिकोन ठेवण्यात आला आहे – सौरऊर्जा, पर्जन्य जलसंचयन, नैसर्गिक बांधकाम साहित्याचा वापर आणि पर्यावरण संवर्धन यावर विशेष भर दिला जात आहे.
या ध्यान केंद्रात ध्यानासाठी स्वतंत्र कक्ष, निवासासाठी खोल्या, कला दालन, ऑडिटोरियम अशा आधुनिक व शांततामय सुविधा असणार आहेत. हा संपूर्ण प्रकल्प वास्तुविशारद शैलेश देवी यांच्या मार्गदर्शनाखाली डिझाईन करण्यात आला असून, पुढील २४ ते ३६ महिन्यांत तो पूर्णत्वास जाणार आहे.

पासग विहार ध्यान केंद्र – केवळ इमारत नव्हे, तर एक आत्मिक चैतन्याची जागा…अशीच नवी उमेद घेऊन अंजनेरी आपल्या अध्यात्मिक ओळखीला पुन्हा उजाळा देत आहे.