इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
आज पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तानच्या डीजीएमओंमध्ये दुपारी १२ वाजता चर्चा होणार आहे. भारताकडून लेप्टिनेंट जनरल राजीव घई तर पाकिस्तानकडून मेजर जनरल काशिफ चौधरी बोलणार आहे. युध्द विरामला मजबूत करण्यासाठी असलेल्या शर्तीचे पालन व स्थीर व सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी ही बैठक महत्त्वाची आहे. त्यानंतर भारत आपली भविष्यातील रणनीती ठरणार आहे. दरम्यान, रविवारी लष्करी ऑपरेशन्स महासंचालकांनी (डीजीएमओ) गेल्या चार दिवसांतील संपूर्ण घटनेची आणि ऑपरेशन सिंदूरची माहिती माध्यमांना दिली. त्यानंतर ही बैठक होणार आहे.
या बैठकीबाबत संरक्षण तज्ज्ञ संजीव श्रीवास्तव यांनी सांगितले की, ही बैठक खूप महत्त्वाची आहे, भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या समझोत्यावर लक्ष केंद्रित केले जाईल, ते कसे चालू ठेवायचे आणि ते कायमचे कसे बनवायचे… जेणेकरून पाकिस्तान पुन्हा या समझोत्याचे उल्लंघन करणार नाही आणि पुन्हा कोणतेही प्रक्षोभक पाऊल उचलणार नाही याची खात्री होईल. या बैठकीत काय होते ते आता समोर येईलच.
भारत-पाकिस्तान यांच्यात आज होणाऱ्या डीजीएमओ स्तरावरील चर्चेबद्दल भाजप नेते दिलीप घोष यांनी सांगितले की,आपण सरकारवर विश्वास ठेवला पाहिजे; जे काही पाऊल उचलण्याची आवश्यकता असेल ते सरकार उचलेल. विरोधी पक्षनेते म्हणून राहुल गांधी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी करू शकतात. जर सरकारला वाटत असेल की विशेष अधिवेशन बोलावण्याची आवश्यकता आहे, तर ते नक्कीच करतील.
काँग्रेस खासदार मनीष तिवारी यांनी सांगितले की, २२ एप्रिल ते १० मे २०२५ या काळात घडलेल्या घटनांवर विशेष संसदीय अधिवेशनात सविस्तर चर्चा व्हावी अशी संपूर्ण विरोधी पक्षाची मागणी आहे. म्हणूनच, आम्हाला वाटते की हे अधिवेशन खूप महत्त्वाचे आहे. गेल्या काही दिवसांत भारतीय सैन्याने दाखवलेल्या शौर्याचे समर्थन करण्यासाठी काँग्रेसने ‘तिरंगा यात्रा’ काढली आहे. काँग्रेस नेहमीच राष्ट्राच्या कल्याणासाठी आणि शत्रूंना योग्य उत्तर देण्यासाठी उभी राहते असेही ते म्हणाले.
असा घडला घटनाक्रम
ऑपरेशन सिंदूर अंतर्गत ६-७ मे च्या रात्री भारताने पाकिस्तानमधील आणि पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ला केला. त्यानंतर पाकिस्तानकडून हल्ले करण्यात आले. परंतु भारताने पाकिस्तानचे सर्व हल्ले परतवून लावले. भारताने ९ मे रोजी पाकिस्तानवर प्रत्युत्तर म्हणून हवाई हल्ला केला आणि १० मे रोजी जोरदार तोफगोळांचा माराही केला. भारताच्या जोरदार प्रत्युत्तरानंतर अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्याशी फोनवरून चर्चा केली. त्यानंतर अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी भारतीय परराष्ट्र मंत्री डॉ. जयशंकर यांच्याशी संवाद साधला आणि पाकिस्तान चर्चेसाठी तयार असल्याचे सांगितले. भारताने स्पष्टपणे सांगितले की ही चर्चा फक्त डीजीएमओंमध्येच होईल. त्यानंतर १० मे रोजी दुपारी पाकिस्तानी डीजीएमओने भारतीय डीजीएमओशी बोलण्यासाठी वेळ मागितला. दुपारी साडेतीन वाजता भारत आणि पाकिस्तान डीजीएमओ यांच्यात चर्चा झाली. या चर्चेत पाकिस्तानी डीजीएमओकडून शस्त्रसंधीची मागणी झाली. भारताचा उद्देश पूर्ण झाला असल्याने भारताने ती मान्य केली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही ट्विट करून भारत आणि पाकिस्तानमधील शस्त्रसंधीची माहिती दिली. या ट्विटनंतर लगेचच परराष्ट्र मंत्रालयाने पत्रकार परिषद घेऊन देशाला शस्त्रबंदीची माहिती दिली. त्यानंतर आता ही बैठक होत आहे..