जगदीश देवरे, नाशिक
खरंतर आपण कोकणात पर्यटनापुरतेच जातो. तिथल्या विस्तीर्ण समुद्र किनाऱ्यापासून सुरू झालेले पर्यटन ताज्या मासोळीवर ताव मारत मारत व्हाया निसर्गरम्य सौंदर्य न्याहाळत, परतीच्या प्रवासात कोकणी प्रॉडक्टचे शॉपींग करुन आपण माघारी परत फिरतो तीच आपल्यासाठी कोकणाची सफर. परंतु, कोकणाची आणखी एक ओळख आहे ती म्हणजे तिथली समृद्ध अशी सांस्कृतिक परंपरा, तिथली गोड माणसं आणि तिथला जिंवत असा ऐतिहासीक वारसा. या गोष्टी पर्यटनाला जाणारे पर्यटक म्हणून सगळेच अनुभवतात असे नाही. ओशन आर्ट हाऊस निर्मीत ओशन फिल्म कंपनीचा व सुबोध खानोलकरांनी दिग्दर्शित केलेला ‘दशावतार’ हा मराठी सिनेमा बघतांना या गोष्टीची जाणिव नक्की होते.
ज्यांनी १९८२ साली रिलीज झालेल्या ‘एक डाव भुताचा’ मधली भुमिका अजरामर केली आणि तोच न्याय २००६ साली रिलीज झालेल्या ‘लगे रहो मुन्नाभाई’ मधल्या महात्मा गांधीजींच्या भुमिकेला देखील तिला, ते दिलीप प्रभावळकर या चित्रपटाचे हिरो आहेत. वय वर्ष ८१…. असून सुद्धा.
शहरीकरणाचा चटका अद्यापही न सोसलेल्या कोकणच्या प्राचीन भागात ‘रंगमंच’ हा आपल्याकडच्या ‘मोबाईल’ इतकाच लोकप्रिय आहे. बाबुली मेस्त्री (दिलीप प्रभावळकर) हा या परंपरागत रंगमंचाचा एक हाफ मॅड चाहता. (हे माझे नाही, चित्रपटातले शब्द आहेत). अगदीच तरुण असल्यापासून तर आता म्हातारपणी अगदी रातआंधळेपणा लागायची वेळ आली, तरी भगवान विष्णूच्या दशावतारी भुमिका साकारतांना ज्याला परमोच्च आनंद मिळतो असा कलाकार. त्याच्या लाकडी ट्रंकेत मत्स्य, वराह, नरसिंह, राम, हनुमान आणि यासारख्या इतर कुठल्याही पौराणिक पात्राच्या भुमिकेसाठी ऑर्डर येतील त्यानुसार वेशभुषा तयार आहेत. या सर्व पात्रांची वेशभूषा, मेकअप आणि अभिनय बाबुली स्वत:च स्वतःच्या हाताने करतो. बाबुलीच्या अदाकारीवर सगळे जाम खुष असतात. यातून त्याला दोन पैसे मिळतात ज्यावर त्याच्या कुटूंबाची उपजिवीका चालते. कुटूंबात माणसे दोनच, एक तो स्वत: आणि दुसरा त्याचा तरुण मुलगा माधव (सिध्दार्थ मेमन). बाबुलीचं वय झालयं, त्याला नीट दिसत नाही, रंगमंचावरचा फोकस असाच डोळ्यावर कायम पडत राहीला, तर एक दिवस कायमचा आंधळेपणा येईल ही रास्त भिती डॉक्टरांना वाटत असली तरी बाबुलीला मात्र त्याचे काहीच वाटत नाही.
माधव आता मोठा झालाय. आपल्या बापाने दशावतार थांबवावा म्हणून तो प्रयत्न करतो. त्यासाठी स्वत: कमावते व्हावे लागेल याची जाणीव त्याला होते. परंतु, शिकल्या सवरलेल्या माधवला कोकणात नोकरी कुठून मिळायची? त्याने बाहेर जावे तर बाबुलीची नाळ कोकणाशी घट्ट जुळलेली, ती कशी तोडायची? शेवटी माधव एका स्थानिक खाणीमध्ये नोकरी पत्करतो आणि आता त्याबदल्यात बाबुलीला दशावतार सोडावा लागेल या निर्णयाप्रत कथानक येते.
पुढे मग चित्रपटाच्या कथानकाचा प्रवाह अगदीच बदलतो, एखाद्या ॲक्शन पॅक्ड चित्रपटासारखा.
कातळशिल्प ही कोकणची ऐतिहासिक ठेव आहे. पण खाण खोदून पैसा कमवायचा असेल तर विकासाच्या नावाखाली तिथे सुरूंग लावावाच लागेल. गेल्या काही दिवसांपासून कोकणवासियांचा असल्या विकासाला असलेला विरोध आपण बातम्यांतून आधीच बघितलेला असल्याने कथानकातला दशावतार संपायला लागतो. खाणीसाठी घेतला गेलेला माधवचा बळी आणि त्यानंतर त्याचा बळी घेणाऱ्या नराधमांना धडा शिकवण्यासाठी रंगमंचावरुन रस्त्यावर आणि नंतर जंगलातल्या कडेकपारीत सुरू होणारा दशावतारी प्रवास. कथानक खुप छान आहे, परंतु सुरूवातीला अस्सल कोकणातल्या मातीतली वाटणारी ही कथा अखेरच्या टप्यात ‘पुष्पा’ सारख्या रंजकतेकडे केव्हा वळण घेते हे प्रेक्षकांना कळतच नाही.
वंदना (प्रियदर्शनी इंदलकर) ही माधवची मैत्रीण. बाबुली मेस्त्री या कथानकाचा शेवट वंदनाकडे सुपूर्द करतांना म्हणतो “आता दशावतार संपलाय आणि भैरवी सुरू झाली आहे”. दशावतार छान जमलाय, परंतु ही भैरवी सादर करतांना जरा गफलतच झाली असे म्हणत प्रेक्षक घराकडे वळतात.
दिलीप प्रभावळकरांचा अभिनय हा या चित्रपटाचा आत्मा आहे. हा एकच आत्मा चित्रपटात पुर्णवेळ वापरला गेला असता तर ती कदाचित मोठी रिस्क ठरली असती. पर्यायाने, ही गोम ओळखून कथानक निर्णायक बिंदुकडे नेण्यासाठी एन्ट्री घेणाऱ्या महेश मांजरेकरांनी वठवलेली मायकेल डिकोस्टा या पोलीस अधिकाऱ्याची भुमिका लाजबाब ठरते. हा डिकोस्टा स्वत:ला गांजील (गांधीलमाशी) म्हणवून घेणारा आणि एकदा मागे लागलो की सुजवल्याशिवाय थांबत नाही असे म्हणणारा, अगदी महेश मांजरेकरांच्या व्यक्तीमत्वाला साजेसाच. प्रियदर्शनी इंदलकर हे महाराष्ट्राच्या हास्यजत्रेतले सौंदर्य कोकणच्या मातीत आणखीनच खुलतांना दिसून येते. माधवची प्रेयसी असलेली आणि सुरूवातीला विनोदाचे पंचेस मारणारी वंदना नंतर मात्र धगधगती मशाल बनते. हा प्रवास अभिनयातून पेलवणे कठीण होते, परंतु प्रियदर्शनीने हा प्रवास अगदीच सोप्पा करून दाखवलाय. माधव मेस्त्री बनलेला सिध्दार्थ मेमन देखील छान. सुनिल तावडे (हवालदार जनार्दन परब), भरत जाधव (फॉरेस्ट ऑफीसर लक्ष्मण परब) यांच्या भुमिका छान आहेत. परंतु, निगेटीव्ह रोलमध्ये ते प्रेक्षकांच्या पचनी पडत नाहीत. नको वाटतात. विजय केंकरे यांची देखील सरमळकर नावाचा खाणीचा मालक उभा करतांना, त्यांच्यातला चरित्र अभिनेता आणि खलनायक यात चांगलीच सरमिसळ झाल्याचे जाणवते.
बाप बाप बाप माझा आवशीचा घो, गोड मानूनी घे रंगपूजा ही गुरू ठाकूरांची गाणी नक्कीच गुणगुणण्यासारखी आहेत. चित्रपट नक्की बघण्यासारखा आहे यात वादच नाही. परंतु, काही तर्क बाजुला ठेवून आणि काही त्रृटी पोटात घालून. आपली कमाई वाढविण्यासाठी राजकीय मदतीने कोकणच्या भुमीचे पोट फाडून खाण उद्योग तिथे पाय पसरू पहातोय. कोकणच्या निसर्ग सौंदर्यावर पडू पहाणारी ही कुऱ्हाड वेळीच रोखली गेली पाहिजे हा मेसेज जरी या चित्रपटाच्या निमीत्ताने जनमाणसात रुजला तरी या दशावताराचे फलीत होईल हे नक्की. जगंलात एक रखवालदार असतो आणि तोच जगंलाचे, कोकणाचे रक्षण करतो असा इथल्या भोळ्या भाबड्या कोकणी माणसाचा समज आहे. या स्वप्नवत वाटणाऱ्या रखवालदाराच्या पायथ्याशी दशावतार नावाच्या मराठी सिनेमाने एक पणती जरी पेटवली तरी पर्यावरण राखणारा मोठा उजेड त्यातून पडेल.