सावधान… चक्रीवादळ येणार… पुढील काही दिवसांसाठी असा आहे हवामानाचा अंदाज…
माणिकराव खुळे, हवामानतज्ज्ञ
बंगालच्या उसागरातील अति तीव्र कमी दाब क्षेत्राचे काल रात्री चक्री वादळात रूपांतर झाले असुन सध्या ते काकीनाडा शहरापासून ५३० किमी. अंतरावर आहे. एम. जे. ओ. च्या त्याचे ‘ मोंथा ‘ असे नामकरण झाले. ‘ मोंथा ‘ चा ‘थाई’ भाषेतील अर्थ म्हणजे ‘ सुवासिक फुल ‘ होय.
उद्या मंगळवार दि. २८ ऑक्टोबर ला रात्री ‘ मोंथा ‘ चक्रीवादळाचे तीव्र चक्रीवादळात रूपांतर होवून आंध्रप्रदेशातील ‘काकीनाडा’ शहराजवळील किनारपट्टी वरून भू-भागावर आदळण्याची शक्यता जाणवते. तेथून पुढे उत्तर दिशेने ते प्रथम ओरिसा व नंतर छत्तीसगड कडे सरकेल.
सध्या बं. उपसागराच्या पूर्वेकडे वि्षुववृत्तीय परीक्षेत्रात म्हणजे फेज ४ व ५ मध्ये मॅडन ज्युलियन ऑसिलेशनच्या साखळीची आम्प्लिट्युड २ च्या दरम्यान आहे. ह्या दोलणामुळे ‘ मोंथा ‘वादळाला वाढीव ऊर्जा मिळत असल्यामुळे तत्याच्या तीव्रतेत वाढ होत आहे.
जेंव्हा ‘मोंथा’ छत्तीसगड मध्ये प्रवेशित होईल तेंव्हा संपूर्ण विदर्भात उद्या पासून तीन दिवस म्हणजे गुरुवार दि. ३० ऑक्टोबर पर्यन्त जोरदार पावसाची शक्यता जाणवते. त्याच्या परिणामातून मराठवाड्यातही त्या तीन दिवसात तुरळक ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता जाणवते.
त्यातही विशेषतः विदर्भातील गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ जिल्ह्यात अति जोरदार पावसाची शक्यता जाणवते.
अरबी समुद्रातील तीव्र कमी दाबाचे क्षेत्र मुंबईच्या नैऋत्येकडे ६६० किमी. अंतरावर असुन त्याची वाटचाल ईशान्य दिशेकडे होत आहे. त्याच्या परिणामातून आजपासुन पुढील तीन दिवस म्हणजे बुधवार दि. २९ ऑक्टोबर पर्यन्त मध्य महाराष्ट्रातील नंदुरबार धुळे जळगांव नाशिक छ. सं. नगर अहिल्यानगर पुणे सातारा कोल्हापूर व कोकणातील मुंबईसह ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग तीन दिवस मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता जाणवते.
बुधवार दि. ५ नोव्हेंबर पासुन महाराष्ट्रात वातावरण निवळण्याची शक्यता असुन त्यापुढे हळूहळू थंडीची चाहूल घेऊ या!
अनेक जिल्ह्यांना २७ ते २९ ऑक्टोंबर दरम्यान ‘यलो अलर्ट’; नागरिकांनी विशेष दक्षता घेण्याचे आवाहन
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार दिनांक २७ ते २९ ऑक्टोंबर २०२५ या कालावधीत अनेक जिल्ह्यात वीजांचा कडकडाट, जोरदार वारे व हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने ‘यलो अलर्ट’जारी करून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
नद्यांच्या विसर्गात वाढ; पूरस्थितीचा धोका
पुणे, नाशिक, अहिल्यानगर,बीड, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार स्वरुपाचे पर्जन्यमान झाल्यास जिल्ह्यातून वाहणाऱ्या नद्यांवरील धरणातून सोडलेल्या विसर्गामुळे पाणी पातळीत वाढ होऊ शकते. त्यापार्श्वभूमीवर नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून करण्यात आले आहे.
सध्या भिमा नदीवर दौंड पूल येथे ४,२३४ क्युसेक, गोदावरी नदीवरील नांदूर मध्यमेश्वर धरणातून ३,१५५ क्युसेक, जायकवाडी धरणातून ९,४३२ क्युसेक, प्रवरा नदीवरील भंडारदरा धारणातून ८२० क्सूसेक, निळवंडे धरणातून ३५० क्यूसेक, मुळा धरणातून ५०० क्युसेक, घोड धरणातून ३०० क्युसेक, विसापूर धरणातून ३४२ क्यूसेक, सीना धरणातून १,०३० क्युसेक, येडगाव धरणातून विसापूर ७५० क्युसेक इतका विसर्ग सुरू आहे.
प्रशासनाकडून नागरिकांना सूचना
मेघगर्जनेच्या वेळी, विजा चमकत असताना किंवा वादळीवारे वाहत असतांना झाडाखाली किंवा झाडांजवळ उभे राहू नये. वीजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा.
गडगडाटीच्या वादळादरम्यान व विजा चमकतांना कोणत्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नये, वीजेच्या सुवाहक भागांशी संपर्क टाळावा, ट्रॅक्टर्स, शेतीची अवजारे, मोटारसायकल / सायकल यांचेपासून दूर रहावे.
मोकळे मैदान, झाडाखाली, टॉवर्स, ध्वजांचे खांब, विद्युत / दिव्यांचे खांब, धातूचे कुंपण, विदयुतवाहिनी अथवा ट्रॉन्सफॉर्मजवळ थांबू नये. सर्व प्रकारच्या अधांतरी लटकणाऱ्या / लोंबणाऱ्या केबल्स् पासून दूर रहावे.
जाहिरात फलक (होर्डिंग्ज) कोसळून होणाऱ्या दूर्घटना टाळण्यासाठी दक्षतेची बाब म्हणून जाहिरात फलकांच्या (होर्डिंग्ज) आजूबाजूला थांबू नये व योग्य ती दक्षता घ्यावी,
विजा चमकत असताना मोकळ्या जागेवर असल्यास सुरक्षेसाठी गुडघ्यावर बसून हाताने आपले कान झाकावे व आपले डोके दोन्ही गुडघ्यांच्यामध्ये झाकावे, जमीनीशी कमीतकमी संपर्क असावा.
धरण व नदीक्षेत्रामध्ये पर्यटनासाठी जाणा-या नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी, धरणाचे पाण्यात वा नदीच्या पाण्याच्या प्रवाहामध्ये उतरू नये, धोकादायक ठिकाणी सेल्फी (Selfie) काढू नये.
नदी, ओढे व नाल्याकाठच्या नागरिकांनी दक्ष रहावे. पाणीपातळीत वाढ होत असल्यास नागरिकांनी नदीपात्रापासुन तसेच ओढे व नाले यापासून दूर रहावे व सुरक्षीत स्थळी स्थलांतर करावे. नदी, ओढे-नाल्यांवरील पुल व बंधा-यांवरुन पाणी वाहत असल्यास पुल/बंधारे ओलांडू नये.
नागरिकांनी स्थानिक प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे पालन करावे. आपत्कालीन परिस्थिती उद्भवण्यापूर्वीच सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे.
जुनाट/मोडकळीस आलेल्या व धोकादायक इमारतीमध्ये आश्रय घेऊ नये.
अतिवृष्टीमुळे भूस्खलन होण्याची व दरडी कोसळण्याची शक्यता असते. त्यादृष्टीने डोंगराच्या पायथ्याशी राहणाऱ्या लोकांनी दक्षता घ्यावी व वेळीच सुरक्षीत स्थळी स्थलांतर करावे. घाट रस्त्याने प्रवास करणे शक्यतो टाळावे.
जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे
जिल्हा नियंत्रण कक्षाच्या टोल-फ्री क्रमांक १०७७ वर संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.








