इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – पोलिसांनी एका चोरट्या नवरीला जेरबंद केले आहे. मध्य प्रदेशातील तब्बल १५ कुटुंबांना तिने फसविले आहे. या सर्व गुन्ह्याची कबुली तिने दिली आहे. तिने कथन केलेले सर्व ऐकून पोलिसही अवाक झाले आहेत.
भोपाळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सासरच्या मंडळींना लुटल्यानंतर ही चोरटी नवरी भूमिगत व्हायची. कधी पुजारी बनून तर कधी रिया नाव घेऊन ती फिरायची. तिचे खरे नाव सीमा असून तिने आतापर्यंत १५ जणांशी लग्न केले आहे. लग्नानंतर ती दोन-चार दिवसच सासरच्या घरी रहायची. कोणता ना कोणता बहाणा करुन ती संपत्ती घेऊन फरार व्हायची. अखेर भोपाळ पोलिसांनी तिला अटक केली आहे.
मंडीदीप येथील पूजा उर्फ रिया उर्फ सीमा खान, बुधवाड्याची रीना उर्फ सुलताना अशा नावाने ही चोरटी नवरी फिरायची. रीना उर्फ सुलताना हिला चार मुले आहेत. लग्नासाठी तयार असलेल्यांचा ती शोध घ्यायची आणि एका मोठ्या टोळीची सदस्य आहे.
दिनेश पांडे नावाच्या व्यक्तीशी तिने लग्न केले. मात्र, काही दिवसांनी तिने सांगितले की मेहुणीचे ऑपरेशन आहे. या बहाण्याने तिने सासरच्या घरून सामान नेले आणि ती परत आलीच नाही. तिने घरातील दोन लाखांचे दागिने व रोख रक्कमही लंपास केली. त्यांनी तातडीने पोलिसात तक्रार दिली. यानंतर आणखी एका व्यक्तीने अशाच प्रकारे आपली फसवणूक झाल्याची तक्रार केली.
पूजा व्यतिरिक्त पोलिसांनी या टोळीतील आणखी एक महिला सुलताना उर्फ रीना हिला अटक केली आहे. या टोळीतील दिनेश पांडे, तेजुलाल, वीरेंद्र धाकड, सलमान खान यांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. असे म्हटले जाते की या लोकांनी कोरोनाच्या काळात आपले काम सुरू केले आणि त्याच काळात त्यांनी वधूच्या शोधात असलेल्या विवाह योग्य तरुणांचा शोध सुरू केला. आणि अनेकांची मोठी फसवणूक केली आहे.