मुंबई – कोरोना वर मात करण्यासाठी केंद्र सरकार देशभरात मोठ्या प्रमाणावर लशीकरण मोहीम राबवत असून पहिला आणि दुसरा डोस पूर्ण करण्यासाठी अभियान राबविण्यात येत आहे. परंतु आता तिसरा बूस्टर डोस देखील आवश्यक आहे, असे भारत बायोटेकने मत व्यक्त केले आहे.
भारत बायोटेकचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक कृष्णा एल्ला यांनी सांगितले की, अँटी-कोरोनाव्हायरस लशीचा तिसरा डोस हा दुसरा डोस घेतल्या सहा महिन्यांनंतर द्यावा, त्यासाठी ही सर्वात योग्य वेळ आहे. त्याचबरोबर त्यांनी नाकातील लशीचे महत्त्वही सांगितले. भारत बायोटेक कंपनी ‘झिका’ ही अँटी-लस बनवणारी जगातील पहिली कंपनी असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
एल्ला यांनी एका कार्यक्रमात सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार ‘कोव्हॅक्सीन’ लशीकरण मोहीम राबवून भारतीय विज्ञानावरील विश्वास दर्शवत आहे. दुसरा डोस दिल्यानंतर सहा महिन्यांनीच तिसरा डोस द्यावा, असेही त्यांनी सांगितले. तिसऱ्या डोससाठी ही सर्वोत्तम वेळ आहे. भारत बायोटेक देखील ‘बूस्टर’ डोस म्हणून अनुनासिक लस ( नाकाद्वारे ) सादर करण्याचा विचार करत आहे.
अनुनासिक लशीच्या महत्त्वाबाबत ते म्हणाले की, संपूर्ण जगाला अशा प्रकारच्या लशी हव्या आहेत. संसर्ग टाळण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे. प्रत्येकजण ‘इम्युनोलॉजी’ शोधण्याचा प्रयत्न करत आहे आणि सुदैवाने, भारत बायोटेकने ते शोधून काढले आहे. इला पुढे म्हणाले की, आम्ही नाकाची लस आणत आहोत. कोवॅक्सीनचा तिसरा डोस नाकाने दिला जाऊ शकतो की नाही हे आम्ही शोधत आहोत, हे धोरणात्मक, वैज्ञानिकदृष्ट्या खूप महत्वाचे आहे कारण
सदर डोस नाकातून दिला तर संसर्ग पसरण्यापासून रोखू शकता.
झिकाविरोधी लसीबाबत एल्ला म्हणाले की, भारत बायोटेकने झिका विषाणूविरोधी लस विकसित केली आहे. चाचणीचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. प्रकरणे अधिक असल्याने सरकारला अधिक चाचण्या कराव्या लागतील. 2014 मध्ये आम्ही झिका विरोधी लस बनवणारी जगातील पहिली कंपनी होतो. झिकाविरोधी लशीसाठी जागतिक पेटंटसाठी अर्ज करणारे आम्ही पहिलेच होतो.