नवी दिल्ली – काही व्यक्तींना लस घेतल्यानंतर कशाची तरी भीती (एन्क्झायटी) वाटत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. अशा व्यक्तींना रुग्णालयात दाखल करावे लागत आहे. लस घेतल्यानंतर भीती वाटण्याची प्रकरणे दहा पटीने वाढली असून, यामध्ये सर्वाधिक महिलांचा समावेश आहे, असे लशीच्या प्रतिकूल परिणामाबाबत सरकारने तयार केलेल्या एका अहवालात प्रसिद्ध करण्यात आले आहे.
जारी केलेल्या पहिल्या अहवालात एन्झायटीचे दोन प्रकरणे समोर आली होती. दुसर्या अहवालात त्यांची संख्या वाढून २० झाली. त्यामध्ये १५ महिलांचा समावेश आहे. लस घेतल्यानंतरही काही व्यक्तींच्या मनातील भीती कमी होत नाही. संबंधित व्यक्तीला होत असलेला त्रास लशीशी संबंधितच असल्याचा भास होतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. लसीकरणामुळे कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू झालेला नाही. ही बाब लशीच्या प्रतिकूल परिणामांवर नजर ठेवणार्या समितीच्या नव्या अहवालात प्रसिद्ध झाली आहे.
तज्ज्ञ सांगतात की, महिलांच्या प्रश्नांवर पुरेशी माहिती न मिळाल्याने त्यांची परिस्थिती जास्त जटिल होते. लशीबाबत मनात गैरसमज न ठेवता विश्वास ठेवला तर भीती वाटण्याचा त्रास होणारच नाही. लोकांच्या विशेषतः महिलांच्या मनात भीती असेल आणि कोणाच्या तरी दबावाखाली लस घेतली तर भीती वाटण्याची शक्यता वाढते.
लसीकरणानंतर ज्या ७८ जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले. त्यापैकी ४८ जणांचा त्रास लसीकरणाशी संबंधित होता. ४८ पैकी २८ रुग्णांची तब्येत बिघडण्यामागे लशीच्या उत्पादनाशी संबंधित प्रतिक्रिया असल्याचे निदर्शनास आले आहे. तर २० रुग्णांना लस घेतल्यानंतर भीती वाटल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. २२ रुग्णांमध्ये लसीकरणाला जबाबदार धरण्यात आलेले नाही.