इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – भारतीय संस्कृतीत आई वडील म्हणजेच माता-पिता यांना परमेश्वरा प्रमाणे स्थान देण्यात आले आहे. कारण ते आपल्याला जन्म देतात, पालनपोषण करतात. शिक्षण देऊन भविष्यातील पुढील वाटचालीचा मार्ग दाखवितात. मात्र आजच्या समाजात काही मुले आपल्या आई वडिलांच्या वृद्धापकाळी त्यांचा नीट सांभाळ करत नाहीत, तर काही जण त्यांचा छ्ळ देखील करतात, ही मोठी शोकांतिका आहे. त्यामुळे काहीवेळा अशा वृद्ध माता-पित्यांना वृद्धाश्रमात राहावे लागते किंवा बेघर होऊन जगावे लागते. मात्र आई-वडिलांना अशी अमानुष वागणूक देणाऱ्या मुलांविरुद्ध न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे.
हरिद्वार एसडीएम (जिल्हा न्याय दंडाधिकारी) यांच्या न्यायालयानेच नुकताच एक ऐतिहासिक निकाल देत आई वडिलांचा छळ करणाऱ्या मुलांना मोठा दणका दिला आहे. काही वृद्धांनी आपल्या आपल्या मुलांविरोधात न्यायालयात खटला दाखल केला होता. यावर सुनावणी करताना न्यायालयानं त्या वृद्धांच्या मुलांना संपत्तींतून बेदखल करत महिनाभरात घर रिकामे करण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय न्यायालयाच्या आदेशाचं पालन न झाल्यास पोलीस प्रशासनाला आवश्यक ती कारवाई करण्यास सांगण्यात आलं आहे.
एसडीएम न्यायालयात हरिद्वारच्या ज्वालापूर, कानखल आणि रावली मेहदूद भागातील सहा वृद्ध जोडप्यांनी खटला दाखल केला होता. आपली मुले आपली अजिबात काळजी घेत नाहीत. तसेच त्यांच्या आजारपणात औषधोपचार करत नाहीत, त्यांच्या खाण्या-पिण्याकडे लक्ष देत नाहीत, असे म्हटले होते. इतकेच नव्हे तर भांडण आणि आपल्याला मारहाण असे न्यालयात दाखल केलेल्या याचिकेत म्हटले होते.
वृद्ध दाम्पत्यांनी दाखल केलेल्या याचिकेत मुलांना स्थावर आणि जंगम मालमत्तेतून बेदखल करण्याची मागणी करण्यात आली होती. याप्रकरणी हरिद्वार एसडीएम कोर्टात सुनावणी सुरू होती. बुधवारी एसडीएम न्यायालयाने ऐतिहासिक निकाल दिला असून पोलिसांना ३० दिवसांत घर रिकामे करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
तसेच न्यायालयाने म्हटले आहे की, असे अनेक वृद्ध दाम्पत्य आहेत ज्यांना असा प्रकारचा त्रास सोसावा लागत आहे किंवा त्यांची मुलं त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहेत. अशा परिस्थितीत वृद्धांच्या सुरक्षेसाठी ‘पालक आणि ज्येष्ठ नागरिक देखभाल आणि कल्याण कायदा’ करण्यात आला आहे. या कायद्यांतर्गत अशा परिस्थितीत राहणाऱ्या वृद्ध किंवा ज्येष्ठ नागरिक न्यायालयात खटल दाखल करून न्याय मागू शकतात. त्याचप्रमाणे आई वडिलांसोबत फसवणूक केल्यासारख्या काही खटल्यांवरही न्यायालयात सुनावणी सुरू आहे. आणि लवकरच याचा निकालही लागण्याची शक्यता आहे.