नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सुमारे दोन अडीच वर्षांपूर्वी देशभरात कोरोनाने हाहाकार माजवला. या काळात देशभरातील अनेक राज्यांमध्ये ऑक्सिजन सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाला. यासंदर्भात अनेक राज्य सरकारांनी केंद्राला ऑक्सिजनचा पुरवठा करण्याची मागणी केली. परंतु वारंवार मागणी करूनही पुरेसा पुरवठा होत नव्हता. त्यामुळे याला केंद्र सरकारच जबाबदार असून ऑक्सिजन अभावी कोरोना रुग्णांचे हाल झाले, हजारो रुग्ण मृत्युमुखी पडले, असा निष्कर्ष समोर आला आहे. कुटुंबकल्याण विभागाच्या स्थायी समितीने जाहीर केलेल्या या अहवालावरून ही बाब स्पष्ट झाली आहे.
या अहवालातून केंद्रातील मोदी सरकारचा हलगर्जीपणा आणि अक्षम्य दुर्लक्ष हजारो जणांचे जीव जाण्यास कारणीभूत ठरली असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. याच अहवालाद्वारे शिवसेनेने मोदी सरकारवर टीकेची चांगलीच झोड उठविली आहे. ऑक्सिजन अभावी झालेल्या कोरोना मृत्यूंबाबत डोळेझाक करणाऱ्या मोदी सरकारच्या डोळ्यांत समितीने झणझणीत अंजनच घातले आहे. ऑक्सिजनअभावी तडफडून मरण पावलेल्या हजारो कोरोना रुग्णांच्या वारसांच्या डोळ्यांत गोठलेले अश्रू सरकारला दिसतील का? कोरोनाचे ‘ऑक्सिजन’ बळी हे वास्तव सरकार मान्य करेल का? आता सरकार म्हणून तुम्ही काय प्रायश्चित्त घेणार आहात?’ असे अनेक सवाल शिवसेनेकडून उपस्थित करण्यात आले आहेत.
कोरोना काळात ऑक्सिजनअभावी एकही मृत्यू झाला नसल्याचा दावा केंद्राने केला होता. मात्र त्यासंदर्भात केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाच्या समितीनेच सादर केलेल्या अहवालाने केंद्र सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ‘कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मृत्यूनं थैमान घातले होते. सगळीकडे ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला होता. आता मात्र, हा अहवाल केंद्र सरकारच्या कोरोना व्यवस्थापनाला अपयशाच्या पिंजऱ्यात उभा करणारा आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता समजून घेण्यात आणि त्या काळात वाढलेल्या ऑक्सिजनच्या मागणीचे आकलन करण्यात केंद्र सरकार कमी पडले, असे त्यात नमूद करण्यात आले आहे. ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे झालेल्या मृतांच्या आकडेवारीचे ऑडिट करून मृतांच्या वारसांना नुकसानभरपाई द्यावी, अशी शिफारसही अहवालात करण्यात आली आहे.
Corona Death Responsible Family Welfare Department Report
Modi Government Union Oxygen Supply