इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
अतिवृष्टी, पूरस्थिती, उद्ध्वस्त पिके, वाहून गेलेली जनावरे, कोसळलेली घरे आणि विस्कळीत वीजपुरवठा या गंभीर परिस्थितीत जनतेला तात्काळ दिलासा मिळावा यासाठी महाराष्ट्र विधानसभेचे विशेष अधिवेशन घेण्यात यावे यासाठी राज्यपालांना पत्र लिहिल्याची माहिती काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली.
ते म्हणाले की, राज्यात ‘ओला दुष्काळ’ जाहीर करावा, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्यात यावी, बाधित शेतकरी व नागरिकांना सरसकट मदत द्यावी अशी मागणी याद्वारे केली.
राज्यपालांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्यातील मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र यांसह अनेक भागांमध्ये झालेल्या विक्राळ अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे निर्माण झालेल्या अत्यंत गंभीर परिस्थितीकडे वेधू इच्छितो. या अभूतपूर्व नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी आणि सामान्य नागरिक पूर्णपणे संकटात सापडले असून त्यांचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे नुकसानीची आणि आपत्कालीन परिस्थितीची काही प्रमुख कारणे व सद्यस्थिती खालीलप्रमाणे आहेत.
पीक आणि शेतीचे प्रचंड नुकसान-
राज्यात तब्बल ४ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील उभी पिके पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत अनेक ठिकाणी शेतजमिनी वाहून गेल्या खरवडून गेल्या आहेत, ज्यामुळे शेतकऱ्यांचे आयुष्यभराचे श्रम मातीमोल झाले आहेत. या हंगामात ५ टक्के देखील उत्पादन हाती येण्याची शक्यता नाही.
मालमत्ता आणि जीवितहानी-
पूरपरिस्थितीत अनेक जनावरे वाहून गेली, घरे कोसळली आणि दुर्दैवाने जीवितहानी देखील झाली आहे. पायाभूत सुविधांचे झालेले नुकसान-
वीजपुरवठा खंडित, विजेचे खांब व तारा कोसळल्याने अनेक ठिकाणी वीजपुरवठा विस्कळीत झाला आहे दळणवळण ठप्प-
गाव आणि शहरांना जोडणारे महत्त्वाचे रस्ते खचल्याने वाहतूक आणि दळणवळण व्यवस्था पूर्णपणे खंडित झाली आहे
आरोग्य समस्या-
पिण्याचे पाणी दूषित झाल्याने सार्वजनिक आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.या गंभीर संकटातून राज्याला बाहेर काढण्यासाठी तातडीने ठोस धोरणात्मक निर्णय घेणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी खालील प्रमुख मागण्यांवर तातडीने निर्णय होणे गरजेचे आहे.
ओला दुष्काळ जाहीर करावा-
राज्यात तातडीने ओला दुष्काळ, जाहीर करून बाधित शेतकरी, कामगार आणि सामान्य नागरिकांसाठी सरसकट, भरीव आर्थिक मदत आणि पुनर्वसन पॅकेज जाहीर करावे.
कर्जमाफी आणि नुकसानभरपाई-
नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याच्या, कर्जमाफी आपल्या आश्वासनाची पूर्तता करण्याची हीच योग्य वेळ आहे. तसेच, पिकांचे आणि मालमत्तेचे योग्य मूल्यमापन करून तात्काळ नुकसानभरपाई देण्यात यावी ही परिस्थिती अत्यंत गंभीर असल्यामुळे, या तातडीच्या प्रश्नावर सविस्तर चर्चा करण्यासाठी, तसेच जनतेला दिलासा देणारे ठोस धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्र विधानसभेचे विशेष अधिवेशन त्वरित बोलावण्याचा आपण सरकारला आग्रह करावा.

