अक्षय कोठावदे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
पिंपळनेर – साक्री तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात दमदार पाऊस झाल्याने भातरोपणीला सुरुवात झाली असून, चिखलणी करून भात रोपणी करताना शेतकऱ्यांची लगबग सुरु आहे. पश्चिम पट्ट्यात भात शेती केली कोकणाप्रमाणेच या भागातही आदिवासी बांधव पारंपरिक पद्धतीने शेती करीत आहे. भात शेती पिंपळनेरच्या पश्चिम पट्ट्यातील भौगोलिक वातावरण अनुकूल असल्याने येथील तांदुळाला सर्वाधिक मागणी असते. रोपणी भातासाठी अगोदर जमिनीवर छोटे छोटे वाफे करून त्यात काडी कचरा गोळा करून जमिनीची भाजणी करून त्या ठिकाणी भाताचे रोप टाकली जातात. ते रोप मोठी झाल्यावर जमीन तयार करतात. प्रथम भात ज्या ठिकाणी लावायचा त्या जागेला चौबाजूने मातीचा उंच बांध बांधून घ्यावा त्या ठिकाणी पावसाचे पाणी साचल्यानंतर चिखलणी करतात.व त्या ठिकाणी भात रोपणी करतात ते काम शेतकऱ्यांनी सुरू केले आहे.
इंद्रायणी, सुकवेल,चिमणसाळ, बासमती,खुशबू,भोवाडया, डावाडया,रूपाली यांचेसह अनेक विविध जातीचे भाताचे आहेत.त्यांची लागवड केली जाते.त्यात पिंपळनेर च्या पश्चिम पट्ट्यातील सगळ्यात जास्त पिकवला व विकला जाणारा तांदळ इंद्रायणी असल्याने इंद्रायणी भाताचे सर्वाधिक क्षेत्र दिसून येत आहे.पिंपळनेर,वार्सा,दहिवेल येथे भरणाऱ्या आठवडेबाजारात या पश्चिम पट्ट्यातील चांगल्या प्रतीचा गावरान तांदूळ विक्रीसाठी उपलब्ध असतो तसेच तांदळाचा सगळ्यात मोठा बाजार शुक्रवारी पिंपळनेर येथील गांधी चौकात भरत असल्याने आदिवासी शेतकरी थेट विक्रीसाठी आणतात.