वृक्षारोपण करण्यापूर्वी
वृक्षारोपण करताना काय काळजी घ्यावी, वृक्षारोपण नक्की कसे करावे याची कल्पना अनेकांना नसते. वृक्षारोपण्यापूर्वीच काही गोष्टी काळजीपूर्वक केल्या तर वृक्षरोपणानंतर त्याचा फायदा दिसून येतो. सुरुवातीपासूनच आपण वृक्षारोपण कशाप्रकारे करायचे ती प्रक्रिया समजून घेऊया.
प्रथम आपण केलेल्या जागेची निवड आणि त्यानुसार वृक्ष प्रजातींची निवड करायला हवी. सर्वप्रथम आपण लागवड केलेल्या रोपांचे संरक्षण व संवर्धन कसे करणार याचा विचार करणे गरजेचे आहे. त्यानंतरच खड्डे करायला हवे. बऱ्याच ठिकाणी अवश्यकता नसताना जेसीबीने खड्डा केला जातो. कारण तो पटकन होतो यादृष्टीने.
पण आपल्याकडे उपलब्ध असलेले रोपांच्या पिशवीचा आकार आणि जेसीबीने केलेला खड्डा यात बरीच मोठी तफावत असते. त्यामुळे खड्डा पटकन होतो पण वृक्ष लागवड करताना तो खड्डा भरण्यास खूप श्रम लागतात. जर जेसीबीनेच खड्डा घ्यायचा असल्यास तो छोट्या पंजाने म्हणजेच दीड फुटाच्या पंजाने जर आपण घेतला तर तो योग्य. शक्यतो सव्वा ते दीड फूट खोल आणि एक ते सव्वा फूट रुंद अशाप्रकारे खड्डा घेतल्यास वृक्षारोपण करतांना अतिरिक्त श्रम व जास्त वेळ लागत नाही.
खड्डा झाल्यानंतर, त्या खड्ड्यामध्ये रोप लावण्याआगोदर, सुरुवातीला निम पेंढ, वाळलेला पालापाचोळा किंवा उपलब्धतेनुसार सेंद्रीय खत टाकावे. त्यास पाणी टाकून ओलावा देणे. जर आपण उन्हाळ्यात वृक्षारोपण करत असाल, तर केलेल्या खड्ड्यामध्ये खड्डाभर पाणी टाकावे. ते पाणी जमिनीत मुरु द्यावे. त्यामुळे मातीला जरा गारवा निर्माण होईल. त्याच्यानंतर निम पेंड, वाळलेला पालापाचोळा हाताने चुरून तीन-चार इंचाचा थर खड्ड्यात करावा.
उपलब्ध नैसर्गिक खत टाकून परत त्याला थोडासा ओलावा द्यावा. मग त्याच्यामध्ये योग्य रीतीने पिशवी फाडून त्या वृक्षांचे रोपण करावे. तसेच, रोप लावल्यानंतर माती वरुन टाकून हलकेच पायाने त्याच्यावर दाब द्यावा. त्यावर उपलब्ध असलेल्या पालापाचोळा किंवा काडीकचऱ्याचे आच्छादन करावे. जेणेकरून ओलावा टिकून राहील. त्यानंतर पुन्हा वरुन कमीत कमी पाच लीटर पाणी टाकावे.
पिशवी अशी फाडावी
पिशवी योग्यरीतीने फाडण म्हणजे काय हे समजून घेऊया. वृक्षारोपणापूर्वी रोप आपल्या समोर ठेवावे. समोरच्या बाजूने दोन्ही हाताच्या अंगठ्याच्या दाबाने ती पिशवी आपल्या विरुद्ध समोरच्या बाजूने खालपर्यंत फाडावी. एखाद्या लहान मुलासारखे त्याला हाताळायचे. अलगद पिशवीचे आवरण त्या रोपाच्या मातीच्या गोळ्यापासून बाजूला करायचे. ते रोप अलगद खड्ड्यामध्ये ठेवायचे. नंतर वरून माती टाकून ती प्रक्रिया पूर्ण करायची. बऱ्याच वेळा काय होतं की, घाईगर्दीत पिशवी फाडली जाते. अर्धी फाडलेली पिशवी खाली ओढली जाते, त्यामुळे बऱ्याच वेळा माती रोपापासून मोकळी होते. अशा वेळेस त्या रोपांना शॉक लागण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात असते. बऱ्याच वेळा शॉक मधून ते रोप तग धरत नाही. परिणामी ते जगत नाही. हाच पहिला टप्पा म्हत्वाचा असतो.
काही जण एका हातात पिशवी धरून दुसऱ्या हाताने फाडायचा प्रयत्न करतात. अशा वेळी ज्या हातात पिशवी धरली जाते, त्या हाताचा मातीच्या गोळ्यावर दाब पडतो. त्यामुळे ती माती मोकळी होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे रोप आपल्यासमोर ठेवायचं आणि त्याच्या समोरच्या बाजूने म्हणजे आपल्या विरुद्ध दिशेने व्यवस्थितरित्या पिशवी फाडायची (आकृति मध्ये दाखवल्या प्रमाणे करावे).
काही रोपांचे मूळ पिशवीच्या खाली बाहेर निघालेले असतात. ती दिशा बघून घ्यावी. ती दिशा आपल्या समोर म्हणजे विरुद्ध बाजूला ठेवून त्या बाजूने आपल्याला ते पिशवीचे आवरण वरपासून खालपर्यंत म्हणजेच मुळापर्यंत व्यवस्थित फाडायचे. कुठल्या प्रकारच्याही ब्लेडचा वापर न करता हे होते. ब्लेड वापरताना बऱ्याच वेळा खोलवर वापरले जाते, त्यामुळेही मूळांची बरीच हानी होते. अशा प्रकारे वृक्षारोपण करतांना काळजीपूर्वक आपण रोपांची लागवड करुया. पुढील भागात वृक्षारोपणाविषयी अजून काही गोष्टी समजून घेऊया.