महानेट वेगाने कधी चालणार?
नागपूरमधील दंतेश्वरी नगराची कालच प्रसिद्ध झालेली बातमी तुम्ही कदाचित वाचली असेल. या नगरामध्ये बहुतांश रहिवासी हे मजुरीचे काम करतात. कोरोनामुळे आधीच कामाची वानवा, त्यात कसे जगायचे आहे प्रश्न असतानाच मुलांच्या ऑनलाइन शिक्षणाचा प्रश्नही त्यांना भेडसावत आहे. मुलांना स्मार्टफोन विकत घेऊन देण्याची आर्थिक ऐपत या पालकांची नाही. शाळा नेहमीसारखी सुरू असती तर मुलांना पाठवले असते परंतु आम्ही रोजच्या रोजगारावर जगणारी माणसं, आम्ही काम करायला बाहेर पडतो आणि मुलांच्या शिक्षणाकडे आमच्याकडून दुर्लक्ष होते. शिक्षणाअभावी आमची मुलेही मोठी होऊन मजूरच होणार का ही भीती आम्हाला भेडसावत आहे….

ब्लॉग – https://ashokpanvalkar.com
एखाद्याकडे फोन असलाच तरी इंटरनेट पॅक घेण्यासाठी पैसे नसतात मग ऑनलाईन शिकवणीला हजर राहता येत नाही. आणि हा सगळा वर्ग शिक्षणापासून दूरच राहतो. अर्थात ही कथा फक्त नागपूरपुरती मर्यादित नाही. महाराष्ट्राच्या गावागावांमध्ये हीच परिस्थिती आहे. मोबाईल असला तरी नेटवर्क नाही, नेटवर्क असले तरी ते वापरण्यासाठी पैसे देण्याची आर्थिक ऐपत नाही. परिणामी मुले फक्त शाळाबाह्य नव्हे तर शिक्षणबाह्यच होण्याचा धोका आहे.
मागच्या वर्षीच्या ऑगस्टमध्ये दूरदर्शन आणि आकाशवाणीवरून एक बातमी प्रसिद्ध झाली होती. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका गावामध्ये राहणाऱ्या एका मुलीला मोबाईल नेटवर्क मिळत नसल्यामुळे तिच्या अभ्यासात खंड पडला आहे, अशी ही बातमी होती . नेटवर्क मिळावे म्हणून तिला रोज एका टेकडीवर चढून जावे लागायचे. ती टेकडी तिच्या घरापासून दोन किलोमीटर लांब होती. तिच्या भावांनी तिच्यासाठी तिथे एक छोटी शेड बांधून दिली होती.तिथे बसून ती अभ्यास करायची. स्वप्नाली सुतार असे या मुलीचे नाव आहे. ही बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर पंतप्रधान कार्यालयाने तिची दखल घेतली आणि स्वप्नालीच्या गावातील ग्रामपंचायतीपासून ते स्वप्नालीच्या घरात केबल टाकून तिला इंटरनेट उपलब्ध करून देण्यात आले. स्वप्नाली ला फायदा झाला परंतु तिच्यासारखी असंख्य विद्यार्थी अजूनही शिक्षणासाठी धडपडत आहेत.
मथुरा वसावे नावाची नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा येथील एक तरुणी तब्बल दोन आठवड्यांसाठी दोन मैत्रिणींसह एका टेकडीवर जाऊन राहिली होती. तिने संपूर्ण परीक्षा तिथे राहूनच दिली. कारण तिकडेच फक्त मोबाईल फोनला इंटरनेट उपलब्ध होत होते. टेकडीवर जाताना तिकडे छोटी शेड बांधण्याचे सगळे सामान घेऊनच त्या गेल्या. टेकडीवर जाण्यासाठी त्यांना तीन तास लागले. तिथेच स्वयंपाक करायचा, अंघोळीसाठी जंगलात जायचे आणि परत शेडमध्ये येऊन परीक्षा द्यायची असा तिचा दोन आठवड्याचा दिनक्रम होता.
