अक्षय तृतीयेच्या दिवशीच भगवान विष्णूने परशुरामाचा अवतार घेतला. त्यामुळेच आजच्या दिवशी चिपळूण येथील श्री परशुराम मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होते. आजच्या या उत्सवाच्या निमित्ताने या अनोख्या मंदिराची ही ओळख…
आज अक्षय्यतृतीया हिंदू आणि जैन धर्मियांचा महत्वाचा उत्सव! साडेतीन मुहुर्तांमधील कायमस्वरूपी शुभ मुहूर्त म्हणून अक्षय्य तृतीया प्रसिद्ध आहे. वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला ‘अक्षय्य तृतीया’ किंवा ग्रामीण भाषेत ‘आखाजी’ म्हणतात. पौराणिक धार्मिक ग्रंथांनुसार या दिवशी जी शुभकार्ये किंवा दानधर्म केले जातात ते कायमस्वरूपी चांगली फळे देतात.
अक्षय्य तृतीया हा मुळातच सर्व सिद्ध सुमुहूर्त मानला जातो. पंचांग वगैरे न पाहता देखील विवाह, गृहप्रवेश, वस्त्र-आभूषणांची खरेदी, नवीन घर, जमीन, वाहन आदींची खरेदी या दिवशी केली जाते. नवीन वस्त्रे प्रावरणे, सोन्या-चांदीचे, हिऱ्या-मोत्याचे दागिने परिधान करणे, नवीन संस्था, दुकानांचा शुभारंभ करणे अतिशय शुभ समजले जाते.
पुराणांनुसार या दिवशी पितरांचे स्मरण केले जाते. आजच्या दिवशी पितरांना तर्पण, पिंडदान, किंवा दान केल्यास त्याचे अक्षय्य फळ मिळते. तसेच या दिवशी केलेले जप, तप, हवन, स्वाद्ध्याय आणि दान देखिल अक्षय्य होते. भविष्य पुराणांत अक्षय्य तृतीयेचे महत्व वर्णन केले आहे. त्यानुसार सत्ययुग आणि त्रेतायुगाचा प्रारंभ याच तिथीला झाला असे मानले जाते. ब्रह्मदेवाचा पुत्र अक्षयकुमार याचा जन्मदिवस आजचाच. जगप्रसिद्ध बद्रीनाथ मंदिरांत अक्षय्य तृतीयेच्या दिवशी प्रतिमा स्थापन करून पूजा केली जाते. तसेच बद्रीनारायणाचे कपाट दर्शानासाठी पुन्हा उघडले जाते. ते आजच्याच मुहुर्तावर! अक्षय्य तृतीयेच्या दिवशीच महाभारताचे युद्ध समाप्त झाले आणि द्वापरयुगाची समाप्ती झाली.
अक्षय्य तृतीयेच्या दिवसाचे आणखी एक महत्व म्हणजे भगवान विष्णू यांनी नर-नारायण, हयग्रीव आणि परशुरामाचा अवतार आजच्याच दिवशी धारण केला. पुराणानुसार सप्त चिरंजीवांमध्ये परशुराम यांचा समावेश केला जातो. परशुराम म्हणजेच भगवान विष्णूचा सहावा अवतार. वामन आणि श्रीराम यांच्यातील अवतार म्हणजे भार्गवराम परशुराम. जमदग्नी ऋषी आणि रेणुका देवी यांच्या पोटी परशुरामाने जन्म घेतला. परशू या शास्त्राच्या सहाय्याने त्याने दुष्टांचा संहार केला. परशुराम जन्माने ब्राह्मण परंतु कर्तृत्वाने क्षत्रिय होता. कोकणच्या निर्मितीचे श्रेय परशुरामाला दिले जाते.
एकविसाव्या वेळी पृथ्वी नि:क्षत्रिय केल्यानंतर जिंकलेली सर्व भूमी त्याने कश्यप ऋषींना दान दिली. आता या दान दिलेल्या भूमीवर रहाण्याचा अधिकार परशुरामाला नव्हता. त्यामुळे त्याने स्वत: साठी नवीन भूमी तयार केली. गुजरात मधील भरूच या ठिकाणाहून त्याने पाच बाण सोडले. त्यापैकी चार बाण कन्याकुमारी येथे पडले आणि एक बाण महेंद्रगिरी पर्वतावर पडला. या बाणांमुळे भारताची पश्चिम कोकणपट्टी तयार झाली. कोकणपट्टीची निर्मिती करणाऱ्या परशुरामाचे अतिशय भव्य आणि प्राचीन मंदिर कोकणात चिपळूण जवळ आहे.
चिपळूण पासून १२ किमी अंतरावर महेंद्रगिरी नावाच्या डोंगरावर भगवान परशुराम यांचे हे सुप्रसिद्ध मंदिर आहे. मंदिराला पौराणिक आणि ऐतिहासिक परंपरा आहे. पंधराव्या शतकात आदिलशहाच्या एका बेगमेने हे मंदिर बांधले असल्याची माहिती येथील फलकावर वाचायला मिळते. समुद्रात भरकटलेली आपली ताटवे परत मिळाल्यास मी तुझे मंदिर बांधीन असा नवस तिने केला. नवसपूर्ती करण्यासाठी बेगमेने हे मंदिर बांधले. त्यामुळेच येथील मंदिरावर आदिलशाहिच्या बांधकामाचा स्पष्ट ठसा दिसून येतो.
इ. स. १६६१ साली येथे शिवाजी महाराज आले होते आणि त्यांनी येथे पूजाविधी केला होता. १६९८ साली गोवालकोंडाचा सरदार सिद्धिस्तत याने हे मंदिर उध्वस्त केले, लुटले. छत्रपती शिवाजी महाराजांनी पूजा केलेल्या मूर्ती फेकून दिल्या. पुढे इ. स. १७०२ साली परमहंस ब्रह्मेन्द्र स्वामींनी कान्होजी आंग्रे, श्रीमंत पेशवे, जंजिराचा सिद्धीयांच्या मदतीने मंदिर पुनर्स्थापित केले. नव्याने मूर्ती बसविल्या.
मंदिर उंचावर असल्याने पायऱ्या चढून मंदिरात यावे लगते. श्री परशुराम मंदिर, भक्त निवास, आणि प्रसादालय ही येथील प्रमुख ठिकाणे. पायऱ्यांसमोर संस्थान श्री भार्गवराम परशुरामचा बोर्ड लक्ष्य वेधून घेतो. समोर गणेश मूर्ती व त्या छोट्या मंदिराला लागुनच भव्य दगडी दीपमाळ आहे.
प्रमुख परशुराम मंदिरांत काळ, काम आणि परशुराम यांच्या काळ्या पाषाणाच्या मूर्ती आहेत. गाभाऱ्याजवळच एक पलंग ठेवलेला आहे. येथे भगवान परशुराम आजही रात्री विश्रांती घेण्यासाठी येतात अशी श्रद्धा आहे. मंदिराच्या मागे रेणुका देवीचे मंदिर आहे. या ठिकाणी रेणुका देवी आपल्या मुलाला आशीर्वाद देण्यासाठी आली असे मानले जाते.
समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेला हनुमान आणि गंगादेवी मंदिर येथे आहे. पूर्वी या डोंगरावर पाणी नव्हते. परशुराम यांनी बाण मारून पाणी आणले. येथेच बाणगंगा नदीचा उगम झालेला आहे. परिसरात मोठे बाणगंगा कुंड आहे. या डोंगरावरुन निसर्गाचे विहंगम दृष्य दिसते. नागमोडी वळण घेणारी वशिष्ठीनदी तिचा हिरवाईने नटलेला समृद्ध परिसर तसेच मुंबई गोवा महामार्गावरील संवत्सर धबधबा हे पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!