इंडिया दर्पण विशेष लेखमाला – निसर्ग यात्री
डॉटर, वॉटर आणि ट्री : शामसुंदर पालीवाल
राजस्थान म्हणजे मरुभुमी. ओसाड, रखरखीत वाळवंट .साडेतीनशे वर्षापूर्वी वृक्षतोड थांबवण्यासाठी राजस्थानातल्या खेजडी गावात ऐतिहासिक चिपको आंदोलन झालं होतं. जलक्रांती करणारे पाणीबाबा राजेंद्र सिंग इथलेच, राजस्थानातले. यात अजून एका निसर्ग यात्रीचे नाव आवर्जून घ्यावे लागेल, ते राजस्थानात नंदनवन फुलवणाऱ्या श्यामसुंदर पालीवाल यांचे. नुकताच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते त्यांना पद्मश्री प्रदान करण्यात आला आणि त्यामुळे ते प्रकाशझोतात आले.जाणून घेऊया त्यांच्या ‘डॉटर, वॉटर आणि ट्री’या अभियानाबद्दल….

मो. 9423932203
असं म्हणतात की,फार प्राचीन काळी राजस्थान हे वाळवंट नव्हतंच.हिमालयात उगम पावणाऱ्या नद्या इथून वाहत होत्या. नद्यांच्याकाठी एकेकाळी प्रगत लोकसंस्कृती नांदत होती. मानवाने लहान-मोठी शहरे वसवली होती. पण ,तिथल्या लोकांनी वारेमाप वृक्षतोड केली. हळूहळू जंगलं नष्ट होऊन शुष्क प्रदेश तयार झाला. त्यामुळे भूपृष्ठाच्या रचनेत बदल होत गेले. हवामान बदलले. नद्यांचे प्रवाह बदलले आणि हळूहळू पाण्याचे प्रवाह या भागातून नाहीसे झाले. मग तयार झालं हे ओसाड वाळवंट. संशोधकांना सापडलेल्या पुराव्यांवरून राजस्थानचं वाळवंट हे अतिप्राचीन आहे. हे मानवनिर्मित नाही. म्हणजेच अगोदरच सुरू झालेल्या नैसर्गिक प्रक्रियांना मानवाने आपल्या दुष्कृत्त्यांनी हातभार लावला आणि या भूमीच्या विनाशाला माणूस कारणीभूत ठरला.
साडेतीनशे वर्षापूर्वी वृक्षतोड थांबवण्यासाठी राजस्थानातल्या खेजडी गावात ऐतिहासिक चिपको आंदोलन झालं होतं. जलक्रांती करणारे पाणीबाबा राजेंद्र सिंग इथलेच, राजस्थानातले. यात अजून एका निसर्ग यात्रीचे नाव आवर्जून घ्यावे लागेल, ते राजस्थानात नंदनवन फुलवणाऱ्या श्यामसुंदर पालीवाल यांचे.पद्मश्री सन्मानित श्यामसुंदर पालीवाल राजस्थानातल्या पिपलांत्री गावात अनेक वर्षांपासून डॉटर,वॉटर आणि ट्री हे अभियान यशस्वीरित्या राबवत आहेत.
प्राचीन काळी सुद्धा लोक येथे राहत होते आणि आताही लोक राहतात.पण मग हळूहळू लोकांनी या वाळवंटी प्रतिकूल परिस्थितीशी झुंज देत आपलं जीवन सुकर करण्याचा प्रयत्न केला आहे. शामसुंदर पालीवाल यांचा जन्म 9 जुलै 1964 ला एका गरीब शेतकरी कुटुंबात झाला. घरात आठ भावंडे आणि आई वडील असा मोठा परिवार होता. सहा वर्षाचे असताना आईचे निधन झाले. घरच्या परिस्थितीमुळे लवकरच शाळा सोडावी लागली. गावात उत्पन्नाचे काहीच साधन नसल्याने संपूर्ण कुटुंब मजुरीसाठी गावोगावी फिरत असे.पण, आपल्या कुटुंबाच्या आणि आपल्या गावाच्या उन्नतीसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे तरच लोकांचा हा वनवास थांबेल म्हणून ते पुन्हा आपल्या पिपलांत्री या गावात आले.
गावाच्या विकासासाठी तिथल्या स्थानिक निवडणुकीत सहभागी झाले आणि ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आले. पिपलांत्री गावाचे सरपंच झाले. पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं.श्याम सुंदर पालीवाल यांच्या आयुष्यात एक दुःखद घटना घडली आणि त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. 2006 मध्ये त्यांची किरण नावाची सहा वर्षाची मुलगी अचानक वारली. मुलीच्या मृत्यूमुळे शामसुंदर पालीवाल पूर्णपणे खचले. त्यांना या धक्क्यातून सावरता येत नव्हतं. त्यावेळी त्यांनी तिच्या स्मृतिप्रीत्यर्थ गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी एक झाड लावलं. अनेक गावकरी या वेळी उपस्थित होते.
आपल्या मुलीच्या मृत्यूच्या शोक करत बसण्यापेक्षा गावातल्या अनेक मुलींचा जन्म सोहळा साजरा करावा ही कल्पना श्याम सुंदर यांना सुचली आणि तेव्हापासून गावात एक आगळीवेगळी प्रथा चालू झाली. जन्माला येणाऱ्या प्रत्येक मुलीच्या नावाने 111 झाडे लावण्याचा संकल्प त्यांनी केला. गावकऱ्यांनीदेखील या संकल्पनेला उत्तम साथ दिली. राजस्थानमध्ये पशूंना चरण्यासाठी परंपरागत अशी राखीव जागा असते. त्या जागेला गोचर भूमी म्हणतात. बरेचदा ही जागा अनेक इतर कामांसाठी वापरली जाते. गावातील लोकांनी झाडे लावण्यासाठी या गोचर भूमीचा वापर करायचं ठरवलं.
मुलीचा जन्म झाल्यानंतर तिच्या भविष्यासाठीही तरतूद असावी याउद्देशाने मुलीचा जन्म झाला की तिच्या नावाने सर्व ग्रामस्थांकडून मिळून एकवीस हजार रुपये व तिच्या कुटुंबीयांकडून दहा हजार रुपये अशी 31 हजार रुपये रक्कम गोळा करून ती मुदत ठेवीच्या स्वरूपामध्ये बँकेत ठेवली जाते.त्या मुलीच्या नावाने 111 झाडे लावली जातात. मुलीचा आणि झाडांचा सांभाळ करण्याबद्दल तसेच त्या मुलीचा बालविवाह न करण्याचं लेखी शपथपत्र घेतलं जातं.ती मुलगी 18 वर्षाची झाल्यानंतर त्या मुलीला ती रक्कम बँकेतून काढण्याचा अधिकार दिला जातो. सर्व गावकऱ्यांनी या योजनेला उत्स्फूर्त पाठिंबा दिला आणि पिपलांत्री गावामध्ये ‘डॉटर,वॉटर आणि ट्री’ ही एक मोठी चळवळ सुरू झाली. मुलीचा जन्म म्हणजेच एकशेअकरा वृक्षांचा जन्म हे समीकरणच झालं.एकीकडे महिला सक्षमीकरण आणि दुसरीकडे निसर्ग रक्षण या दोन चळवळी गावात सक्षमपणे सुरू झाल्या.
श्याम सुंदर पालीवाल यांच्या या अनोख्या योजनेचा प्रचार हळूहळू जगभर झाला. श्यामसुंदर यांची निसर्गाप्रती आणि समाजाप्रतीअसलेली निष्ठा प्रत्येक गावकऱ्याला त्यांना मदत करायला भाग पाडते. त्यामुळे आज पिपलांत्री गाव एक आदर्श गाव म्हणून ओळखले जाते. सद्यस्थितीत ह्या गावात तीन लाखापेक्षा जास्त वृक्षांची लागवड झाली आहे. वृक्षारोपणामुळे गावातील पाण्याचा प्रश्न मिटला. तिथे अनेक पशुपक्षांचा अधिवास दिसू लागला. अनेक वनौषधी या इथल्या निसर्गात उपलब्ध झाल्या. तिथल्या लोकांना रोजगार मिळाले.
शेती, पशुपालन वाढलं.आणि सर्वात महत्वाचं म्हणजे यासोबतच गावातल्या मुलींना सन्मानाची वागणूक मिळू लागली.आज ह्या गावात मुलींच्या जन्माचा उत्सव साजरा होतो. आजही रक्षाबंधनाच्या दिवशी गावातली प्रत्येक महिला झाडाला राखी बांधते. झाडाला भाऊ मानते. श्यामसुंदर पालीवाल सांगतात डॉटर वॉटर आणि ट्री हे तीन शब्द माझ्या जीवनाचे ध्येय आहे.
श्यामसुंदर पालीवार यांच्या या अनोख्या कार्याची कथा राजस्थानच्या माध्यमिक शाळांच्या पाठ्यपुस्तकात समाविष्ट करण्यात आली आहे .तसेच डेन्मार्कसारख्या युरोपातल्या देशातील विद्यार्थ्यांना पिपलांत्री हे एक आदर्श गावाचं उदाहरण म्हणून सांगितलं जातं.स्त्री विकास आणि सोबतच निसर्गरक्षण हे अनोखं गटबंधन श्यामसुंदर पालीवाल यांना पद्मश्री सारखा पुरस्कार देऊन गेलं. त्यामुळे त्यांना आता पर्यावरण स्त्रीवादाचा जनक या नावानेही ओळखलं जातं.
माणसाला जे वाळवंट भकास, वैराण वाटतं ते प्रत्यक्षात मात्र जिवंत आणि रसरशीत असतं. जमिनीखाली, जमिनीवर,आकाशात झाडीझुडपांच्या आश्रयाने हरतऱ्हेचे जीव जगत असतात.माणसासारखा बुद्धिमान प्राणी निसर्गाचा समतोल बिघडवून यांचं नैसर्गिक जीवन अभावितपणे, अजाणतेपणे किंवा कधीकधी स्वार्थासाठी उध्वस्त करत असतो. हा कळतनकळत होणारा नाश थांबवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हळूहळू या मरुभुमीचं रूप पालटू लागेल.
वाळवंटात झाडंझुडपं दिसायला लागतील.गवताचे पुंजके हवेवर डूलू लागतील. माणसाने निसर्गाशी सख्य राखलं तर पुन्हा एकदा या वाळवंटाचा समतोल साधता येईल.पुन्हा एकदा वाळवंट हिरवाईने नटेल.असंख्य जिवाचा पोशिंदा असलेलं हे वाळवंट निसर्गाशी जुळवून घेईल. वाळूमध्ये उमटलेली माणसाची पावलं ही नेहमीच विनाशाची असतील असं नाही ती कधीकधी मांगल्यसूचकही ठरू शकतात.
Column Nisarg Yatri Padmashree Shayam sunder Paliwal