इंडिया दर्पण विशेष – भन्नाट – इंडिया लेंडस
आयआयटीतून शिक्षण घेतलेल्या दोन तरुणांनी खऱ्या अर्थाने भन्नाट म्हटले जाईल असे स्टार्टअप सुरू केले आहे. त्यामुळेच त्याचा आजा सर्वत्र बोलबाला आहे. जाणून घेऊ या अनोख्या स्टार्टअपबद्दल…

(लेखक व्यवस्थापनशास्त्र तज्ज्ञ आहेत)
मयंक कच्छवाह आणि गौरव चोपडा आयआयटी मद्रास मधून २००५ मध्ये आपले अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण करून कॅपिटल वन नावाच्या ब्रिटिश कंपनीमध्ये नोकरीला लागले. इंग्लंड मध्ये सर्व प्रकारचे कर्ज पुरविणारी कॅपिटल वन ही एक नावाजलेली कंपनी होय. या कंपनीमार्फत सर्वच प्रकारचे लोन अगदी सुलभरित्या दिले जातात. लोन घेणार्याचे कागदपत्र, त्याची विश्वासार्हता आणि त्याने लोन परत करण्याची क्षमता या सगळ्या गोष्टी ऑनलाईन पद्धतीनेच या कंपनीद्वारे चेक केल्या जातात. या कंपनीत लागल्यापासूनच दोघांच्याही मनात लोन वितरण करण्याच्या पद्धती बद्दल विशेष कुतूहल वाटू लागले.
भारतात कोणाला जर कर्ज घ्यायचं असेल तर मात्र अशी कुठलीही ऑनलाइन प्रकारची पद्धत नसून प्रत्येक वेळेला तुम्हाला फिजिकल कागदपत्र उपस्थित करावे लागतात. आणि या कागदपत्रांच्या जोरावरच कर्ज घेणाऱ्याची मूल्यमापन कंपन्यांद्वारे केले जाते. आणि यामुळे कर्ज मिळविण्याच्या प्रक्रियेत फार दिरंगाई होत असते. आणि कागदोपत्री जर कोणाला आपली विश्वासार्हता सिद्ध करता आली नाही तर मात्र कितीही गरज असून देखील त्या व्यक्तीला लोन दिले जात नाही. भारतात असलेल्या कर्ज बाजाराची ही परिस्थिती या दोघांनाही चांगलेच ज्ञात होती. आणि म्हणूनच अनेकदा दोघांच्याही चर्चेमध्ये भारतात अशी एखादी कंपनी असावी असं सतत येत असे.
2015 मध्ये गौरव चोपडाने अखेर तो निर्णय घेतला. आपला आठ-दहा वर्षांचा कर्ज क्षेत्रातील अनुभव व याकाळात जमवलेली मिळकत घेऊन गौरव भारतात परतला. आणि कर्ज क्षेत्रात कॅपिटल वन सारखी कंपनी स्थापन करण्याच्या शक्यता पडताळू लागला. याकरता त्याने अनेक बँका यांच्याशी संपर्क साधला. या सोबतच अनेक कर्ज घेणारे ग्राहक व कर्ज न मिळालेले लोक यांच्या देखील त्याने भेटी घेऊन सर्वान समोरील अडचणींचा पूर्ण अभ्यास केला. तेव्हा त्याच्या असं लक्षात आलं की कर्जाची गरज अनेकांना असली तरी स्वतःची केवळ विश्वासार्हता सिद्ध करता येत नसल्यामुळे लोकांना कर्ज मिळणं अवघड होत आहे.
हा सर्व अभ्यास करताना त्याच्या आणखी एक मोठी गोष्ट लक्षात आली ती म्हणजे बँका किंवा कुठलीही वित्तीय संस्था कर्ज देताना कमी रकमेचे कर्ज देण्यास टाळाटाळ करतात. याउलट मोठ्या रकमेचे कर्ज देण्यासाठी उत्सुक असतात. आणि त्यामुळे विश्वासार्हता असून देखील लहान कर्जांची गरज असलेल्या लोकांना कर्ज सहज उपलब्ध होत नाही. आणि म्हणून बऱ्याच जणांना वैयक्तिक कर्ज म्हणजेच पर्सनल लोनचा मार्ग अवलंबावा लागतो. पर्सनल लोन वर मात्र अवाजवी दराने व्याज घेतले जाते आणि त्यामुळे हे कर्ज न परवडणारे होते.
