जयपूर (राजस्थान) – भारतीय राज्यघटनेत सर्व धर्म समभाव असा उल्लेख असतानाही गेल्या काही वर्षात आपल्या देशामध्ये धार्मिक तेढ वाढत असल्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे दोन धर्मांमध्ये ताणतणाव निर्माण होऊन दंगली सदृश्य घटनांमध्येही वाढ होत आहे. याला काही समाजकंटक कारणीभूत ठरतात. वास्तविक अशा घटना घडायला नको, परंतु सामुदायिकपणे रस्त्यावर नमाज पठण केले की, लगेच रस्त्यावरच महाआरती सुरू होते. त्यातून मग आणखीनच ताणतणाव वाढत जातो, अशाच प्रकारची घटना राजस्थानमध्ये नुकतीच घडली आहे.
गेल्या आठवड्यात कॉलेज कॅम्पसमध्ये नमाज पठण करणाऱ्या एका विद्यार्थ्याचा निषेध करण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (एबीव्हीपी ) काही कार्यकर्त्यांनी महाविद्यालयात हनुमान चालीसा पठण केले. यानंतर घोषणाबाजीही करण्यात आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जयपूरमधील राजस्थान विद्यापीठाशी संलग्न कॉलेजमध्ये एका विद्यार्थ्याने नमाज अदा केली. त्याबाबत कॉलेजच्या शिक्षकांनी कॅम्पसमध्ये नमाज अदा करण्यावर आक्षेप घेतला होता.
त्यानंतर आता अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (एबीव्हीपी) कार्यकर्त्यांनी कॅम्पसमध्ये आदिवासी स्वातंत्र्यसैनिक बिरसा मुंडा यांना त्यांच्या जयंतीनिमित्त श्रद्धांजली अर्पण केली, त्यानंतर नमाज पठणाचा निषेध म्हणून हनुमान चालिसाच्या श्लोकांचे पठण केले. या दोन घटनांनंतर आता कॉलेजमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियाच्या (एनएसयूआय) सदस्यांनी धर्माच्या नावाखाली अशा प्रकारचा आक्षेप घेतल्याबद्दल शिक्षकाला निलंबित करण्याची मागणी केली आहे.
एनएसयूआयचे जिल्हाध्यक्ष राजेश चौधरी म्हणाले की, ज्या शिक्षकाने नमाजला आक्षेप घेतला तो आरएसएसशी संबंधित आहे. हा विद्यार्थी मोकळ्या मैदानात नमाज अदा करत होता. मात्र धर्माच्या नावाखाली कोणालाही त्रास देणे चुकीचे आहे. तर, अभाविपचे प्रदेश सचिव होशियार मीना म्हणाले की, शिक्षण क्षेत्राच्या कॅम्पस, कॉरिडॉरचे वातावरण आम्ही खराब होऊ देणार नाहीत. केवळ महाविद्यालयीन विद्यार्थी नव्हते तर कॅम्पसमध्ये नमाज अदा करणारे इतर काही नागरिकही होते. ते सहन केले जाऊ शकत नाही.
दरम्यान, विद्यापीठाच्या संलग्न महाविद्यालयांनी शैक्षणिक कॅम्पसमध्ये असे प्रकार घडू देऊ नयेत यासाठी पोलिसांनी कुलगुरूंना सूचना दिली आहे. भविष्यात अशा प्रकारचे कोणतेच उपक्रम शैक्षणिक कॅम्पसमध्ये होऊ नयेत, असेही बजावले आहे.