मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यात अडचणीत सापडलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रति क्विंटल ३०० रुपये सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी विधानसभेत केली होती. यानिर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मात्र, ही रक्कम कमी असल्याची ओरड शेतकरी वर्गाने केली होती. तसेच, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना किमान ५०० रुपये सानुग्रह अनुदान द्यावे, अशी मागणी विरोधकांनी केली होती. त्याची दखल अखेर घेण्यात आली आहे.
यासंदर्भात विधानसभेत निवेदन करताना मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, खरीप हंगामातील लाल कांद्याची आवक मोठ्या प्रमाणावर आहे. देशातील इतर राज्यातील कांद्याचे उत्पादन वाढल्याने पुरवठ्याच्या प्रमाणात मागणी कमी आहे. त्यामुळे कांद्याच्या दरामध्ये घसरण झाली आहे. कांदा नाशवंत पीक असल्याने त्याला किमान आधारभूत किंमत लागू करता येत नाही. कांदा हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे नगदी पीक असून त्याला मिळणारा भाव कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील जिव्हाळ्याचा भाग आहे.
अवकाळी पावसामुळे झालेल्या पीक नुकसानीचे पंचनामे सध्या सुरू आहेत. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना ३०० रुपये प्रति क्विंटल सानुग्रह अनुदानाची घोषणा करण्यात आली होती. त्यात आता ५० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता प्रति क्विंटल ३५० रुपये सानुग्रह अनुदान मिळणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी आज विधानसभेत केली.
https://twitter.com/ddsahyadrinews/status/1636731552720904193?s=20
देशातील कांदा उत्पादन त्याची देशांतर्गत मागणी व देशातून होणारी निर्यात इत्यादी सर्व बाबींचा परिणाम बाजारपेठेतील कांद्याच्या दरावर होतो आणि झालेला आहे. उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने एक समिती नेमली होती. समितीने दोनशे आणि तीनशे रुपये प्रतिक्विंटल शिफारस केली होती. परंतु हे सरकार कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणारे असून त्यांना दिलासा देण्यासाठी सानुग्रह अनुदान म्हणून प्रति क्विंटल ३०० रुपये देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
https://twitter.com/MahaDGIPR/status/1636739101373394944?s=20
CM Shinde announcement Onion Farmers Compensation