इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी मुंबईत राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी येणं गरजेचं नाही, असे विधान केले. त्यानंतर त्याचे पडसाद सर्वत्र उमटले. विधिमंडळातही विरोधकांनी सरकारला लक्ष्य केले. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले की, महाराष्ट्राची पहिली भाषा ही मराठीच आहे. महाराष्ट्रात येणा-यांनी मराठी शिकलंच पाहिजे. मी भैय्याजी जोशी यांचे वक्तव्य एेकलेलं नाही. त्यामुळे ते पूर्ण एेकून मी त्यावर बोलेन. पण, आमची सरकारची भूमिका काय आहे तर मुंबईची, महाराष्ट्र शासनाची भाषा ही मराठीच आहे. महाऱाष्ट्रात राहणा-या प्रत्येकाने मराठी शिकलं पाहिजे. प्रत्येकाला मराठी बोलता आलं पाहिजे. खरं म्हणजे माझ्या वक्तव्याचा संदर्भात भैय्याजींचं देखील काही दुमत असेल असे मला वाटत नाही असे फडणवीसांनी सांगितले.
महाविकास आघाडीने केला निषेध
महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भैय्याजी जोशी यांनी मराठीविरोधी केलेल्या विधानाचा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हुतात्मा स्मारकाजवळ निषेध केला तसेच हुतात्म्यांना अभिवादन करुन ही मुंबई तुटू देणार नसल्याची शपथ घेतली.
राजद्रोहाचा गुन्हा दाखल करा- उध्दव ठाकरे
उध्दव ठाकरे यांनी भैय्याजी जोशी यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. महाराष्ट्रात फूट पाडणारे ही लोक अनाजीपंत आणि औरंगजेब आहेत. ते मराठी – अमराठी विष कालवण्याचा प्रयत्न करत आहे. कोणी किती विष कालवण्याचा प्रयत्न केला तरी मुंबई महाराष्ट्रापासून हिसकावून देणार नाही. मुंबई तोडण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. भाषावर प्रांतरचना देशाची झाली. आता मुंबईची प्रांतरचना करत आहे. भैय्याजी जोशी चिल्लर माणूस आहे हे मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावे. महाराष्ट्रात मराठी भाषा सक्तीची करण्याचा कायदा मी मुख्यमंत्री असताना केला होता. त्यामुळे त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करावे असे ठाकरे म्हणाले.