इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पुणे जिल्ह्यातील तळेगावनजीक इंदोरी येथे इंद्रायणी नदीवरील एक पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेचे वृत्त ऐकुन अतिशय दुःख झाले.
या घटनेत प्राथमिक माहितीनुसार २ लोकांचा मृत्यू झाला आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
या घटनेसंदर्भात विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक आणि संबधित तहसीलदार यांच्याशी मी सातत्याने संपर्कात आहे. काही जण वाहून गेल्याने त्यांचा युद्धपातळीवर शोध घेतला जात आहे. घटनास्थळी एनडीआरएफला पाचरण करण्यात आले आहे. मदत कार्याला तातडीने वेग देण्यात आला असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.
६ जणांना आतापर्यंत वाचविण्यात यश आले आहे. सर्व यंत्रणांना अलर्ट मोडवर ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ३२ लोक जखमी झाले, त्यापैकी ६ गंभीर आहेत. त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्वतः विभागीय आयुक्त घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत.
पुणे जिल्ह्यातील तळेगावनजीक इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून झालेल्या घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची आर्थिक मदत राज्य सरकारतर्फे करण्यात येईल, तसेच जखमींच्या उपचाराचा खर्च सुद्धा राज्य सरकार करेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सायप्रस येथे आगमन झाल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दूरध्वनी करून पुणे जिल्ह्यातील पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेची माहिती घेतली आणि या घटनेबाबत तीव्र दुःख व्यक्त केले आहे. या मदतकार्यात राज्य सरकारला सर्व ती मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.