इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नागरी हवाई वाहतूक मंत्री राम मोहन नायडू, राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ, नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाचे सचिव समीर कुमार सिन्हा आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आज नवी दिल्लीत उडान भवन इथे पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी एअर इंडियाच्या AI171 या विमानाच्या दुर्दैवी अपघाताविषयी तपशीलवार माहिती दिली. यावेळी अपघातानंतर केंद्र सरकारने तातडीने केलेली कारवाई, सध्या सुरू असलेल्या चौकशींची स्थितीगती आणि भविष्यातील विमान सुरक्षा विषयक सुधारणा याबाबतही सविस्तर माहितीही देण्यात आली. या पत्रकार परिषदेला सुरुवात करण्यापूर्वी एक मिनिटांची शांतता पाळून या अपघातातील मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
घटनेचा तपशील
12 जून 2025 रोजी, एअर इंडियाचे AI171, हे बोईंग 787-8 ड्रीमलायनर प्रकारातील अहमदाबाद ते लंडमधील गॅटविक विमानतळ असा प्रवास करणारे विमान, उड्डाण केल्यानंतर अवघ्या एका मिनिटात कोसळले. ही दुर्घटना अहमदाबादमधील दाट लोकवस्ती असलेल्या मेघाणी नगर भागात घडली. या विमानात 230 प्रवासी, 2 वैमानिक आणि 10 इतर कर्मचारी मिळून एकूण 242 जण होते.
या दुर्घटनेतील मृतांमध्ये मेघाणी नगरमधील युवा वैद्यकीय विद्यार्थी आणि प्रवाशांचाही समावेश आहे. त्यांचा आकस्मिक मृत्यू फक्त त्यांच्या कुटुंबियांसाठी नाही, तर देशाच्या भविष्यासाठीही एक मोठी हानी आहे.
वरिष्ठ नेत्यांची भेट आणि मदत कार्य
या दुर्घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तात्काळ घटनास्थळी आणि अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटलला भेट दिली. त्यांनी जखमी तसेच मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. पंतप्रधानांनी बचाव आणि मदतकार्याचाही आढावा घेतला. त्यांच्या अध्यक्षतेखाली विमानतळावरच एका उच्चस्तरीय बैठकीचेही आयोजन केले गेले, या बैठकीत पुढच्या उपाययोजनांसंबंधीचे निर्देश दिले गेले.
गृहमंत्री अमित शहा यांनीही दुर्घटनेनंतर तात्काळ घटनास्थळाला भेट दिली. त्यांनी स्वतः घटनास्थळावरील परिस्थितीचा आढावा घेतला, तसेच केंद्रीय यंत्रणांना पीडितांच्या कुटुंबीयांना आवश्यक ती सर्व मदत पुरवण्याचे निर्देशही दिले.
नागरी हवाई वाहतूक मंत्री राम मोहन नायडू आणि राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ यांनीही अपघातानंतर तात्काळ घटनास्थळाला भेट दिली. त्यांनी पीडित कुटुंबीयांशी संवाद साधला. आपत्कालीन वैद्यकीय सेवा देत असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांशीही त्यांनी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन परिस्थितीचा आणि प्रतिसादात्मक कार्यवाहीचा आढावा घेतला.
शोकसंवेदना आणि सहवेदना
नागरी हवाई वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी या दुर्दैवी घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांबद्दल तीव्र शोक व्यक्त केला. या दुर्घटनेने संपूर्ण देश हादरला असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. या दुर्घटनेतील सर्व पिडितांप्रति विशेषतः मृत पावलेल्या युवा विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांप्रति त्यांनी सहवेदना व्यक्त केल्या. यावेळी राम मोहन नायडू यांनी त्यांनी स्वतः आपल्या वडिलांना अपघातात गमावल्याचा वैयक्तिक अनुभव सामायिक करत शोकमग्न कुटुंबांच्या वेदना आपण अधिक चांगल्या प्रकारे समजू शकत असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली.
आपत्कालीन प्रतिसाद आणि समन्वय
घटनेनंतर काही तासांतच नागरी उड्डाण मंत्रालयाने आपल्या मुख्यालयात अविरत सेवा नियंत्रण कक्ष सक्रीय केला. या कक्षात डीजीसीए, बीसीएएस, सीआयएसएफ आणि एएआयचे कर्मचारी समन्वय साधत होते. त्याच वेळी राष्ट्रीय माध्यम केंद्रामध्ये एक स्वतंत्र माध्यम नियंत्रण कक्षही कार्यान्वित करण्यात आला.
कुटुंबीयांना मदत करण्यासाठी खालील हेल्पलाईन क्रमांक कार्यान्वित करण्यात आले:
अहमदाबाद विमानतळ आपत्कालीन हेल्पलाईन: 9974111327
एमओसीए नियंत्रण कक्ष : 011-24610843 / 9650391859
एअर इंडीया प्रवासी हेल्पलाईन : 1800-5691-444
एमओसीए, डीजीसीए,एएआयबी, एएआय आणि बीसीएएस मधील वरिष्ठ अधिकारी तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि बचाव कार्यावर देखरेख ठेवण्यासाठी मदतीसाठी उपस्थित राहिले.
कुटुंबीयांना मदत
प्रभावितांच्या कुटुंबीयांना संपूर्ण मदत देण्याबाबत सरकारने एअर इंडिया व्यवस्थापनाला स्पष्ट निर्देश दिले आहेत. या उपाययोजनांमध्ये पुढील गोष्टी समाविष्ट आहेत:
तत्काळ सानुग्रह मदतीचा निधी वितरित करणे
नातेवाईकांना लॉजिस्टिकविषयक आणि भावनिक मदत
प्रभावित कुटुंबीयांना भेटण्यासाठी आणि मदत करण्यासाठी एअर इंडियाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती
ब्रिटिश नागरिक आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी गॅटविक, लंडन येथे स्वतंत्र मदत केंद्राची स्थापना
जखमींसाठी कागदपत्रांची पूर्तता, प्रवास व्यवस्था व रुग्णालय समन्वयात मदत
मंत्र्यांनी स्पष्ट केले की ही घटना केवळ तांत्रिक तपासणी म्हणून न घेता मानवी दृष्टीकोनातून पाहणे आवश्यक आहे, आणि शोकाकुल कुटुंबीयांना शक्य ती सर्व मदत दिली जाईल.
सुरू असलेल्या तपास प्रक्रिया
विमान अपघात तपास संस्थेने (एएआयबी) याच दिवशी अपघाताची औपचारिक तपासणी सुरू केली. एएआयबी चे महासंचालक यांच्या नेतृत्वाखाली पाच सदस्यीय जीओ समिती तत्काळ घटनास्थळी पाठवण्यात आली आणि नंतर न्यायवैद्यक व वैद्यकीय तज्ज्ञांची त्यात भर घालण्यात आली.
13 जून रोजी सायंकाळी सुमारे 5 वाजता विमानाचा ब्लॅक बॉक्स हस्तगत करण्यात आला. हा तपासणीसाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरला आहे. ब्लॅक बॉक्स डिकोडिंगद्वारे उड्डाणाच्या शेवटच्या क्षणांबाबत महत्त्वाची माहिती मिळण्याची अपेक्षा आहे.
बहुआयामी पुनरावलोकनासाठी उच्चस्तरीय समिती
एक स्वतंत्र आणि सर्वांगीण चौकशी करण्यासाठी केंद्रीय गृह सचिव यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीत पुढील विभागांचे अधिकारी सहभागी आहेत:
नागरी उड्डाण मंत्रालय
गृह मंत्रालय
गुजरात राज्य शासन
डीजीसीए, बीसीएएस, भारतीय हवाई दल, गुप्तचर विभाग
राज्य आपत्ती प्रतिसाद प्राधिकरण
राष्ट्रीय व राज्यस्तरीय न्याय वैद्यक
समितीची मुख्य उद्दिष्टे :
घटनेचा तांत्रिक, कार्यप्रणालीविषयक आणि नियामक दृष्टिकोनातून सखोल अभ्यास करणे.
कोणतीही प्रणालीगत किंवा संस्थात्मक त्रुटी ओळखणे.
तीन महिन्यांच्या आत एक संपूर्ण अहवाल सादर करणे.
प्रमाणन प्रणाली, आपत्कालीन प्रतिसाद प्रक्रिया, कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आणि हवाई वाहतूक व्यवस्थापन प्रणाली यासह विमान वाहतूक सुरक्षेसाठी दीर्घकालीन सुधारणा सुचवणे.
विमान अपघात तपास ब्युरो (AAIB) तांत्रिक बाबींची चौकशी करेल, तर ही उच्चस्तरीय समिती भविष्यातील सुरक्षेसाठी धोरणात्मक आणि व्यापक मार्गदर्शक आराखडा तयार करेल, अशी माहिती मंत्र्यांनी दिली. ही समिती सोमवार, 16 जूनपासून आपला विचारविनिमय सुरू करणार आहे.
विमान देखभाल आणि निरीक्षण उपाययोजना
नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) एअर इंडियाला Genx इंजिन लावलेल्या सर्व बोईंग 787-8 आणि 787-9 विमाने तात्काळ तपासण्याचे आदेश दिले आहेत. सध्या भारतात सेवा देत असलेल्या 33 ड्रीमलायनर विमानांपैकी 8 विमानांची तपासणी आधीच पूर्ण झाली असून उर्वरित विमानांची तपासणी तातडीने सुरू आहे. नागरी विमानवाहतूक महासंचालनालयाने भारतात कार्यरत सर्व वाइड-बॉडी विमानांसाठी देखभाल शिष्टाचार आणि उड्डाणयोग्यता प्रक्रियेवर लक्ष केंद्रित करत निरीक्षण अधिक तीव्र केले आहे.
विमान वाहतूक सुरक्षेबाबत भारताची वचनबद्धता
आंतरराष्ट्रीय नागरी विमानवाहतूक संघटना (ICAO) सारख्या संस्थांनी भारताच्या विमानवाहतूक नियामक प्रणालीचे सतत उच्च दर्जाचे मूल्यांकन केले आहे, असे मंत्र्यांनी भारताची जागतिक विमानवाहतूक सुरक्षेतील विश्वसनीयता अधोरेखित करताना सांगितले. मंत्र्यांनी सरकारच्या सुरक्षा आणि पारदर्शकतेप्रतीच्या अढळ वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.