इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – देशभरातील भाविकांच्या दृष्टीने महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या चारधामच्या यात्रेला जाण्यासाठी नोंदणी बंद झाली आहे. त्यामुळे डेहराडून शहरात जवळपास तीन हजार यात्रेकरू फसले आहेत. नोंदणी न झाल्यामुळे एक हजार यात्रेकरूंनी आयएसबीटीमध्ये मुक्काम ठोकला आहे. इतर यात्रेकरूंनी धर्मशाळा, हॉटेल आणि आश्रमात आश्रय घेतला आहे.
येथील काउंटरवर शुक्रवारी सकाळपासून यात्रेकरूंनी नोंदणीसाठी रांग लावली होती. परंतु नोंदणी होणार नसल्याची माहिती मिळाल्यानंतर यात्रेकरूंनी अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडीमार केला. अनेक यात्रेकरूंनी राज्य सरकारने केलेल्या व्यवस्थेवर रोष व्यक्त केला आहे.
निवासाची व्यवस्था नसल्याने अनेक यात्रेकरूंना आयएसबीटीमध्ये मुक्काम ठोकला आहे. नोंदणी न झाल्यामुळे यात्रेकरूंच्या बससुद्धा चारधामच्या यात्रेला जाऊ शकत नाही. नोंदणी झाल्यानंतर हृषीकेशमध्ये थांबण्याचे सर्वात जास्त नुकसान बाहेरील राज्यांमधून आलेल्या ट्रॅव्हल एजंटाचे होत आहे. एका ट्रॅव्हल एजंटच्या माहितीनुसार, यात्रेकरूंना जितके दिवस हृषीकेशमध्ये थांबावे लागेल, तितक्या दिवसांच्या खाण्या-पिण्याची आणि राहण्याची सोय करावी लागत आहे. येथील केंद्रावर दिवसभर नोंदणीचे काम बंद राहिले.
नोंदणी झाल्यावरच यात्रेकरूंनी यावे, असे पुन्हा पुन्हा आवाहन प्रशासनाकडून करूनही यात्रेकरू त्याकडे लक्ष देत नाहीत. त्यामुळे अव्यवस्थेचा त्रास त्यांनाच सहन करावा लागत आहे, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. उधम नगर येथील हेंकुंड साहिब गुरूद्वारामध्ये हेमकुंड साहिबसाठी ४०२ यात्रेकरूंनी नोंदणी केली आहे.