मधूर गुजराथी
….
महात्मा फुलेंच्या सत्यशोधकीय विचार महाराष्ट्राला सतत प्रेरणादायी
चांदवड – महात्मा फुलेंच्या सत्यशोधकीय विचार हा महाराष्ट्राला सतत प्रेरणादायी ठरला आहे व तो चिरंतन आहे. असे विचार कुलगुरू डॉ नितीन करमळकर यांनी चांदवड येथील लोढा -जैन महाविद्यालयात मराठी विषयाचा राष्ट्रीय परिसंवाद प्रसंगी मांडले. महात्मा फुले यांचे योगदान हे केवळ मराठी साहित्य विश्वालाच नाही तर एकूणच जागतिक साहित्यात अतिशय महत्वाचे ठरले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या विचारानुसार वाटचाल करीत आहे. सर्वसामान्य विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच रोजगार निर्मिती साठी प्रभावी पाऊले आम्ही उचलत आहोत असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे डॉ. नितीन करमळकर यांनी केले.
चांदवड येथील महाविद्यालयात मराठी विभाग अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष, व महात्मा फुले अध्यासन केंद्र सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या सत्यशोधक चळवळीचे महाराष्ट्राच्या वैचारिक जडणघडणीत योगदान विषयावर आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय परिसंवादात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष बेबीलाल संचेती उपस्थित होते. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. जी. एच. जैन यांनी केले. महाविद्यालयाच्या एकूण प्रगतीची वाटचाल त्यांनी प्रास्ताविकात विशद केली.
यानंतर महात्मा फुले अध्यासन केंद्राचे समन्वयक व शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर मराठी विभागाचे सेवानिवृत्त मराठी विभाग प्रमुख डॉ.विश्वनाथ शिंदे यांनी महात्मा फुले अध्यासन केंद्राच्या वतीने या परिसंवादाच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. अध्यासन केंद्र हे केवळ विद्यापीठापुरते मर्यादित राहू नये. तर या अध्यासन केंद्राच्या सहकार्य व ग्रामीण भागात देखील विविध महाविद्यालयांमध्ये महात्मा फुले यांच्या विचारांशी संबंधित उपक्रम राबविले जावेत. या हेतूने हा परिसंवादा महाविद्यालयात आयोजित करण्यात येत आहे. मान्यवरांचा परिचय संस्थेच्या विश्वस्त मंडळाचे सदस्य व समन्वयक कांतीलाल बाफणा यांनी करून दिला. मान्यवरांना दिलेल्या मानपत्राचे वाचन प्रबंध समिती सदस्य व सी.ए. महावीर पारख यांनी केले. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे सेवानिवृत्त मराठी विभागप्रमुख आणि विचारवंत प्रल्हाद लुलेकर यांनी सांगितले की, नुसत्या विचारांवर न थांबता फुले दांपत्याने प्रत्यक्ष कृतीवर भर दिला. स्त्री व पुरुष यांचे स्वतंत्न अस्तित्व मान्य केले. शिक्षणाचा हेतू मनुष्यत्व वृद्धिंगत करणे आहे असे सांगून नव व्यवस्थेची पायाभरणी केली. यानंतर अहमदनगर महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख डॉ. सुधाकर शेलार विज्ञानवादी व ईहवादी विचार परंपरेला पुनरुज्जीवित करण्याचे काम महात्मा फुले यांनी केले. राज्यघटनेचा सरनामावर फुले विचारांचा प्रभाव दिसतो. महात्मा फुले यांच्या विचार व कार्य यातील पैलूंचा संबंध बहुजन वादाशी जोडला पाहिजे. परिसंवादाचा समारोप करताना प्रसिद्ध साहित्यिक व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ नागनाथ कोत्तापल्ले म्हणाले की, महात्मा फुले व राजा राम मोहन रॉय यांनी सामाजिक सुधारणांना वेग दिला. महात्मा फुले यांनी प्रतिमा भंजनाचे मोठे काम केले. त्यातून प्रेरणा घेऊन विठ्ठल रामजी शिंदे व श्री.म. माटे यासारखे सुधारक तयार झाले. फुले यांच्या सत्यशोधक चळवळीचा प्रभाव मराठी साहित्यावर प्रभावीपणे झाल्यामुळे मराठी साहित्याला एक नवीन विचारांची दिशा मिळाली. यानंतर प्राचार्य व्ही बी गायकवाड आण विद्यापीठाचे कुलसचिव डॉ प्रफुल्ल पवार यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. प्रमुख अतिथी म्हणून मनोगतात डॉ. नितीन करमळकर यांनी सांगितले की, कला वाणिज्य व विज्ञान असे ज्ञानशाखांचे वर्गीकरण न करता लिबरल यंत्रणा वृद्धिंगत करणे काळसुसंगत आहे. महाविद्यालयांनी देखील उद्योग क्षेत्राशी सुसंवाद प्रस्थापित करून रोजगार निर्मितीकडे लक्ष द्यावे. त्यामध्ये जिज्ञासू वृत्ती विकिसत करून इनोवेशन क्लब सारखे उपक्रम अगदी तालुकास्तरावर देखिल राबविता येतील. आता प्रॉडक्ट डिझाईन पेक्षा डिझाईन थिंकिंग महत्त्वाचे आहे. यावेळी व्यासपीठावर विश्वस्त मंडळाचे उपाध्यक्ष दिनेश कुमार लोढा, मानद सचिव जवाहरलालजी आबड, प्रबंध समितीचे उपाध्यक्ष अरविंदकुमार भन्साळी, झुंबरलाल भंडारी, सुनिलकुमार चोपडा, वर्धमानजी लुंकड, पी.पी.गाळणकर, विविध महाविद्यालयांचे प्राचार्य उपस्थित होते. सुत्रसंचालन उपप्राचार्य या परिसंवादाचे आयोजक मराठी विभाग प्रमुख डॉ.तुषार चांदवडकर यांनी केले. आभार प्रदर्शन उपप्राचार्य डॉ दत्ता शिंपी यांनी केले.