नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– चांदोरी येथे ऐतिहासिक श्रीराम मंदिर असून श्रीरामनावमी उत्सवाची तयारी अंतिम टप्यात पोचली आहे. विशेष म्हणजे या मंदिराची स्थापना शके १६१३ साली झाली असून मंदिराला ऐतिहासिक महत्त्व आहे, मटकरी घराण्याचे मूळपुरुष वै. बालाजीपंत बल्लाळ हे पूर्वी संगमनेर येथील जोर्वे या गावी राहत असतं पुढे त्यांना श्रीरामाची उपासना करण्याची आज्ञा झाली आणि श्रीराम पंचायतन प्रसादरूपी प्राप्त झाले पुढे त्यांनी जोर्वे हे गाव सोडून नाशिक त्रंबकेश्वर अशी भटकंती केली पण मन रमले नाही, मग चांदोरी या गावी नदी किनारी शांत परिसर बघून त्यांनी १६१३ साली तिथे मंदिर स्थापन करून श्रीराम उपासना सुरू केली, इथला श्रीराम उत्सव हा बारा बलुतेदारांचा उत्सव म्हणून प्रसिद्ध आहे. विविध जातीची लोक एकत्र येऊन हा श्रीराम जन्मोत्सव साजरा करतात.
गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर ब्रम्ह ध्वजा उभारून उत्सवाला सुरुवात होते पुढे श्रीरामनावमी पर्यन्त कीर्तन प्रवचन विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. विशेष म्हणजे उत्सव काळात विविध जातीची लोक स्वतःहून उत्सवाची जबाबदारी पार पाडतात, जसे पाणी पिण्याची रांजण कुंभार समाजातील व्यक्ती घेऊन येतो, श्रीरामाची पालखी बनवण्याचे काम सुतार समाजाला आहे, श्रीरामनवमी चे देवाचे कपडे शिंपी समाजाचा मान आहे, असे विविध समाजा कडे विविध मान देण्यात आलेले आहेत. श्रीरामनवमी च्या दिवशी श्रीराम पंचायतन असलेला डोलारा याची व्यवस्था सोनार समाज्या कडे असते, श्रीरामनावमी च्या दिवशी हाच डोलारा पालखी मध्ये घालून मंदिर परिसरातील पिंपळ पाराला अकरा प्रदक्षणा घातल्या जातात पालखी खांद्यावर उचलण्यासाठी भक्तांमध्ये मोठी चुरस होते, या प्रदक्षणा पूर्ण झाल्या नंतर श्रीराम त्यांच्या आसनावर विराजमान होतात आणि मग दुपारी १२.३० वाजताची सूर्याची किरणे आरश्या मार्फत श्रीरामाच्या मुखवरती चमकवून श्रीराम जन्म झाला असे समजण्यात येतें हा आरसा चमकवण्याचा मान न्हावी समाज्या कडे असतो.
अशा अनोख्या पद्धतीने साजरा होणारा श्रीराम जन्मोत्सव या वर्षी रविवार ६ एप्रिल रोजी सकाळी ११.३० ते दुपारी १२.३० पर्यंत श्रीराम मंदिर चांदोरी येथे बघता येणार आहे. तरी सर्व भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन श्रीराम संस्थान चे विश्वस्त आणि परंपरागत पुजारी श्रीकांत मटकरी अजय मटकरी यांनी केले आहे.