नवी दिल्ली – पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेले शेतकरी आंदोलन आणि कृषी कायद्यांवर चर्चा झाली. तिन्ही कृषी कायदे लवकरात लवकर मागे घेऊन एमएसपीची हमी द्यावी, अशी आग्रही मागणी कॅप्टन यांनी गृहमंत्री शहा यांच्याकडे केली. ही चर्चा जवळपास ४५ मिनिटे चालली. तिन्ही कृषी कायद्याबाबत तोडगा काढण्यासाठी ते भाजपमध्ये प्रवेश करू शकतात अशी चर्चा सुरू झाली आहे.
कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पंजाबच्या मुख्यमंत्रिपदावरून नुकताच राजीनामा दिला आहे. कॅप्टन यांच्या राजीनाम्यानंतर त्यांनी दिल्लीत घेतलेल्या भेटीबाबत विविध चर्चा सुरू झालेल्या आहेत. तीन नव्या कृषी कायद्यांबाबत तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेऊन ते दिल्लीला पोहोचल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. शेतकरी आंदोलन मागे घेण्यात ते महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. त्यासाठी केंद्र सरकारकडून ते रणनीती तयार करवून घेऊ शकतात, असेही बोलले जात आहे.
माध्यमांच्या वृत्तांनुसार, कॅप्टन अमरिंदर सिंग लवकरच गृहमंत्री अमित शहा यांची दुसर्यांदा भेट घेऊ शकतात. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेटही घेण्याची शक्यता आहे. या भेटीदरम्यान अंतिम फेरीतील चर्चा होण्याची शक्यता आहे. पंजाब काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांच्याशी दीर्घकाळ संघर्ष झाल्यानंतर नाराज होऊन कॅप्टन यांनी नुकताच मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. तीन कृषी कायद्याबाबत तोडगा काढण्यासाठी कॅप्टन लवकरच भाजपममध्ये प्रवेश करू शकतात, असे बोलले जात आहे.
काही माध्यमांच्या वृत्तांनुसार, कॅप्टन अमरिंदर सिंग भाजपमध्ये दाखल होऊ शकतात. त्यांना केंद्रीय कृषीमंत्री बनविले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ते भाजपमध्ये गेले तर भाजप त्यांना राज्यसभेवर पाठवू शकतो. तसेच कृषीमंत्री करून पंतप्रधान मोदी यांच्या मंत्रिमंडळात त्यांचा समावेश होऊ शकतो.