मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेनेत निर्माण झालेले संकट आणि राजकीय घडामोडींना आलेला वेग या सर्व पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेतली. महाराष्ट्रात लवकरच सत्तांतर होणार असल्याचा दावा यावेळी त्यांनी केला आहे. तसेच, एकनाथ शिंदे हे भाजपमध्ये प्रवेश करणार का यासह अनेक प्रश्नांची उत्तरे त्यांनी दिली आहेत.
पाटील म्हणाले की, आम्हाला मिळालेल्या वृत्तानुसार एकनाथ शिंदे हे ३५ आमदारांसह गेले आहेत. म्हणजे तांत्रिकदृष्ट्या उद्धव ठाकरे सरकार अल्पमतात आले आहे. मात्र, व्यवहारात सरकार अल्पमतात येण्यास थोडा वेळ लागेल. ते म्हणाले की, विधान परिषद निवडणूक आणि सर्व राज्यांच्या निवडणुकांमध्ये आम्हाला चांगला पाठिंबा मिळाला आहे. अनेक अपक्ष आमदार आणि छोट्या पक्षांच्या नेत्यांनी आम्हाला मतदान केले.
भाजपला सत्ता स्थापनेची कुठलीही घाई नसल्याचे संकेत पाटील यांनी दिले आहेत. ते म्हणाले की, सध्या अविश्वास ठरावासाठी विशेष अधिवेशन बोलावण्याची परिस्थिती निर्माण झालेली नाही. १८ जुलैपासून सभागृहाचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्या दरम्यान आपण याबद्दल बोलू. एवढेच नाही तर भाजपच्या सरकार स्थापनेच्या दाव्यावर पाटील म्हणाले, ‘आता काहीही बोलणे घाईचे आहे. आम्ही सध्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. एकनाथ शिंदे यांनी आम्हाला कोणताही प्रस्ताव पाठवलेला नाही किंवा त्यांना भाजपनेही काही ऑफर दिलेली नाही.
यासोबतच पाटील म्हणाले की, राजकारणात कधीही काहीही होऊ शकते. उद्धव ठाकरेंच्या सभेला शिवसेनेचे ३५ आमदार गैरहजर राहिल्याने भाजप नेत्याचा दावा बळकट दिसत आहे. महाराष्ट्र विधानसभेत भाजपचे १०६ आमदार असून त्यांना अन्य १३ अपक्ष नेत्यांचा पाठिंबा आहे. अशा परिस्थितीत त्यांना शिवसेनेच्या २६ आमदारांनी पाठिंबा दिल्यास सरकार स्थापनेसाठीचा जादुई आकडा भाजपला गाठता येऊ शकतो.
चंद्रकांत पाटील यांची पत्रकार पाहण्यासाठी बघा हा व्हिडिओ
https://twitter.com/ChDadaPatil/status/1539179281141710849?s=20&t=4bd87l5gB1ccSRTz1ZHT9w
bjp president chandrakant patil press conference on eknath shinde and shivsena