नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भाजपकडून काँग्रेससह अन्य पक्षांवर घराणेशाहीचा आरोप होतो. भादपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी काही दिवसांपूर्वीच वक्तव्य केले की, घराणेशाही आणि परिवार पार्ट्यांचा शेवट होत आहे. खासकरुन या विचारधारेवरील प्रादेशिक पक्ष नष्ट होत असून येत्या काही वर्षात केवळ भाजपच राहणार आहे. त्यांच्या या वक्तव्याने देशभर उलटसुलट चर्चा सुरू आहे. त्यांचे हे विधान खरे आहे का, घराणेशाही खरंच संपते आहे का, नड्डा खरे बोलले का, केवळ भाजप हा पक्ष परिवार पार्टीशिवाय आहे का, सत्य काय आहे आदी बाबी आता आपण जाणून घेऊया…
भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचे ते भाषण सध्या चांगलंच गाजत आहे. महत्वाची बाब म्हणजे महाराष्ट्रात सुरु असलेल्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर तर हे भाषण अधिकच चर्चेचा विषय ठरले आहे. जे. पी. नड्डा यांच्या हस्ते बिहारच्या काही जिल्ह्यातील भाजप कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं. त्यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना नड्डा यांनी देशात केवळ भाजपच राहणार असल्याचा दावा करत खळबळ उडवून दिली. या प्रसंगी नड्डा म्हणाले की, भाजपशी दोन हात करण्याची क्षमता कोणत्याही पक्षात नाही. भाजपची लढाई वंशवाद आणि परिवारवादाशी आहे, असा दावा नड्डा यांनी केला. मात्र, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतील भाजप उमेदवारांची यादी पाहिली तर भाजपनेही घराणेशाहीवरच जोर दिल्याचे दिसून येत आहे. मात्र आता भाजपाध्यक्षांचं भाषण आणि वास्तव यात तफावत असल्याचे दिसून येते.
बिहारमधील भाजपाच्या १६ जिल्हा पक्ष कार्यालयाचं उद्घाटन जेपी नड्डा यांच्या हस्ते झाले. यावेळी समारोपाच्या कार्यक्रमात बोलताना जे पी नड्डा यांनी प्रादेशिक पक्षांवर हल्ला चढवला. सध्या देशातील कोणत्याही राष्ट्रीय पक्षात भाजपविरोधात लढण्याचे सामर्थ्य राहिलेले नाही. महाराष्ट्रातदेखील शिवसेनेला घरघर लागली आहे. काँग्रेसचेही अनेक राज्यांतून गाशा गुंडाळण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता उरलेले पक्षही संपतील. देशात फक्त भाजप शिल्लक राहील, असा दावा जे पी नड्डा यांनी केला. आता कोणताही पक्ष भाजपाला मात देऊ शकत नाही, असे ते म्हणाले.
प्रत्यक्षात पाहिले तर भाजपमध्ये देखील एक प्रकारे घराणेशाही दिसून येते. कारण कोणत्याही निवडणुकीत तिकीट देताना भाजप नेते हे त्या पक्षातील नेत्यांच्या पत्नी, मुला-मुलींना किंवा नातेवाईकांना उमेदवारी तथा तिकीट देतात असे आढळून आले आहे. तसेच अन्य पक्षातील घराणेशाहीचा लोंढे आता त्यांच्याकडे येत आहेत, त्यामुळेच राजकारणात कोणीही धुतल्या तांदळासारखा नसतो ! असे म्हटले जाते त्याची प्रचिती भाजपच्या बाबतीत वारंवार दिसून येते.
काँग्रेसवर टीका करताना नड्डा यांनी काँग्रेसला भावा बहिणींचा पक्ष म्हटले आहे. मात्र असे असले तरी भाजपची २०१९ मधील लोकसभा उमेदवारांची यादी पाहिली तर भाजपही घराणेशाहीला खतपाणीच घालत असल्याचे दिसून येते. महाराष्ट्रातील भाजपच्या २३ उमेदवारांपैकी ९ उमेदवार घराणेशाहीतील होते. त्यात, हिना गावित (नंदुरबार, माजी मंत्री विजयकुमार गावित यांची कन्या), सुभाष भामरे (धुळे, माजी आमदार गोजरा भामरे यांचा मुलगा), रक्षा खडसे (रावेर, माजी मंत्री एकनाथ खडसेंच्या स्नुषा), डॉ. भारती पवार (दिंडोरी, माजी आमदार ए. टी. पवार यांच्या स्नुषा), पूनम महाजन (मुंबई उत्तर मध्य, भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या कन्या), कांचन कुल (बारामती, रासपचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी), सुजय विखे पाटील (अहमदनगर, माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा मुलगा), प्रीतम मु्ंडे (बीड, भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या), रणजितसिंह नाईक निंबाळकर (माढा, माजी खासदार हिंदुराव निंबाळकर यांचा मुलगा).
घराणेशाहीमुळे लोकशाहीसमोर आव्हान निर्माण झाले आहे, या विषयावर भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा आणि तत्कालीन विरोधी पक्षनेते आणि सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत दोन महिन्यापूर्वीच रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या वतीने एक चर्चासत्र झाले. त्यात समारंभात काँग्रेसचे दिवंगत नेते बलराम जाखड यांचे चिरंजीव आणि पंजाब काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड यांनी भाजपमध्ये पक्षात प्रवेश केला.
मध्य प्रदेशातही भाजपनं काँग्रेसचे दिवंगत नेते माधवराव सिंधीया यांचे चिरंजीव ज्योतिरादित्य सिंधीया यांना पक्षात प्रवेश देत काँग्रेसचे सरकार पाडले. इतकेच नाही तर ज्योतिरादित्य शिंदे यांना केंद्रात मंत्रिपदही देण्यात आले आहे. काँग्रेसचे दिवंगत नेते जितेंद्र प्रसाद यांचे चिरंजीव जितिन प्रसाद यांनाही भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला आहे. त्यामुळे भाजपमध्ये घराणेशाहीला स्थान नाही असा दावा करणारे भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचे वक्तव्य किती पोकळ आहे हे दिसून येते. तशी टीका विरोधकांकडून केली जात आहे. दरम्यान, केंद्रीय तपास यंत्रणांचा धाक दाखवित असल्याने अनेक परिवार पार्टी आणि घराणेशाहीतील नेते भाजपमध्ये जात आहेत. भाजप त्यांना स्विकारत आहेत. शिवाय भाजपमध्येही दोन गट आहेत. एक मूळ भाजपमध्ये म्हणजे अनेक वर्षांपासून असलेले आणि दुसरा म्हणजे अन्य पक्षातून आलेला.
BJP Chief J P Nadda Claim Politics Truth Nepotism