मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी X (पूर्वीचे ट्वीटर) या सोशल प्लॅटफॉर्मवर केलेले ट्विट (लिंक: https://x.com/bhatkhalkara/status/1925130462118531179?s=46) अत्यंत द्वेषपूर्ण, धार्मिक तेढ निर्माण करणारे आणि काँग्रेस पक्षाची व कार्यकर्त्यांची बदनामी करणारे आहे. सदर ट्विटमुळे समाजात वैरभावना आणि अशांतता निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपा आमदार अतुल भातखळकर यांच्याविरोधात तात्काळ गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी अशी लेखी तक्रार काँग्रेस नेते धनंजय रामकृष्ण शिंदे यांनी दादर पोलीस स्थानकात दिली आहे.
या संदर्भात बोलताना शिंदे म्हणाले की, अतुल भातखळकर हे एक जबाबदार लोकप्रतिनिधी आहेत पण त्यांचे वागणे हे सातत्याने बेजबाबदारपणाचे राहिले आहे. ते आपल्या सोशल मीडिया हँडल्सवरून साततत्याने द्वेष पसरवण्याचे व धार्मिक तेढ करणा-या पोस्ट करतात. त्यांच्या या कृत्यामुळे सामाजिक शांतता भंग पावण्याची दाट शक्यताच आहे. वर लिंक दिलेली त्यांची पोस्ट अत्यंत आक्षेपार्ह असल्याने त्यामुळे त्यांच्यावर
- भारतीय न्याय संहिता २०२३, कलम १९६–धार्मिक किंवा सामाजिक गटांमध्ये तेढ निर्माण करणे
- कलम ३५२ – वैरभावना किंवा सार्वजनिक तेढ निर्माण करणारी विधाने.
- कलम ३५१(१) – शांतता भंग करण्याच्या हेतूने अपमान.
- कलम ३५६ – बदनामी करणे.
- माहिती तंत्रज्ञान कायदा २०००, कलम ६७/६९A – ऑनलाइन बदनामीकारक किंवा सार्वजनिक सुव्यवस्थेला धोका निर्माण करणारा मजकूर.
या कलमाखाली गुन्हा नोंद करून त्यांना अटक केली पाहिजे असे शिंदे म्हणाले. यापूर्वी काँग्रेस पक्षाने अर्णव गोस्वामी (पालघर प्रकरण, २०२०) आणि अमित मालवीय (https://www.thehindu.com/news/national/other-states/congress-files-complaint-against-amit-malviya-for-defamatory-post/article25678912.ece) यांच्याविरोधात अशाच खोट्या आणि बदनामीकारक मजकुरासाठी तक्रारी दाखल केल्या आहेत, ज्याचा आदर्श येथे लागू होतो. त्यामुळे या प्रकरणी तात्काळ कारवाई करून सामाजिक सलोखा आणि शांतता राखण्यासाठी सहकार्य करावे अशी विनंतीही शिंदे यांनी दादर पोलिसांना केली आहे.