मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली तर युवराज राहुल गांधी खुश होतात, हे ठाऊक असल्याने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे बरळू लागले आहेत. मात्र आपल्या बरळण्यामुळे आपण पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनाच खोटे ठरवत आहोत याचे भान नानाजींना राहिलेले नाही, अशी टीका भारतीय जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे.
प्रसिद्धी पत्रकात पाध्ये यांनी म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विषयी बोलताना पटोले यांनी आपली पात्रता तपासून घ्यावी, असे आम्ही सुचवणार नाही. घटनेने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यानुसार नाना पटोले यांना आपले मत व्यक्त करण्याचे पुरेपूर स्वातंत्र्य आहे. मात्र विचार करून बोलणे आणि बरळणे यातील फरक पटोले यांना लक्षात आलेला नाही. काँग्रेसच्या अध्यक्ष श्रीमती सोनिया गांधी यांनीं पंतप्रधान मोदी यांच्या सुरक्षा व्यवस्थेतील ढिलाईबद्दल पंजाबच्या मुख्यमंत्र्यांची कानउघाडणी केल्याचे वृत्त पटोले यांचे वाचण्यात आले नसावे. हे वृत्त वाचले असल्यास त्याचा अर्थ पटोले यांच्या लक्षात आला नसावा.
पंतप्रधान मोदी यांच्या सुरक्षा व्यवस्थेत ढिलाई झाल्याचे खुद्द सोनिया गांधी मान्य करत आहेत. पटोले यांनी मात्र सुरक्षा व्यवस्थेत ढिलाई झाली नसल्याचेच वारंवार सांगत आहेत. राहुल गांधींच्या हुजरेगिरीसाठी आपण आपल्या पक्षाच्या अध्यक्षांना खोटे पाडले आहे, हे पटोले यांना केव्हा लक्षात येणार हे परमेश्वरालाच ठाऊक, असेही उपाध्ये यांनी पत्रकात म्हटले आहे.