विशेष प्रतिनिधी, नाशिक
हेवीवेट नेते छगन भुजबळ व शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांच्यातील विवादाला नांदगाव विधानसभा मतदार संघातील अस्तित्वाच्या लढाईची किनार आहे. सलग दुसऱ्यांदा कुणालाही निवडून न देणाऱ्या मतदार संघातून हॅट्ट्रिक करू पाहणाऱ्या पंकज भुजबळ यांच्या पराभवाचे शल्य बोचत असलेले पालकमंत्री छगन भुजबळ स्पेस शोधण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे या संघर्षातून दिसून आले आहे. सुहास कांदे यांची एंट्री झाली तो काळ पंकज भुजबळ यांच्यासाठी बस्तान बसविण्याचा प्रारंभ होता. येवल्याची बारामती करू पाहणाऱ्या भुजबळांचे आकर्षण असलेल्या नांदगावकरांना नांदगावचे किमान येवला होईल अशी अपेक्षा होती. काही प्रमाणात त्यादृष्टीने चांगले प्रयत्न देखील झालेत. मात्र सलग दुसऱ्यांदा कुणालाही विजयी न करणाऱ्या नांदगावकर मतदारांनी राहून गेलेल्या विकासकामासाठी पंकज याना संधी दिली. नेमके याच काळात स्वपक्षातील अनेकजण त्यांना सोडून जाऊ लागले. अशापैकी बहुतांशी मंडळींनी शिवसेनेचे सुहास कांदे यांचा पर्याय स्वीकारला. काट्याने काटा काढण्याचा प्रयत्न यशस्वी झाल्याने भुजबळांचे स्थानिक मतदार संघातील स्वकीय मोकळा श्वास घेऊ लागले.
सुहास कांदे यांच्या विजया नंतर राज्यातील सत्ताकारण बदलल्याची पार्श्वभूमी होती. त्यातच पहिल्या इनिंगला मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता वाढली होती. पक्षप्रमुख सुहास कांदे मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीयात असूनही विकासकामासाठी निधीची जाणवणारी अस्वस्थता कांदे विरुद्ध भुजबळ संघर्षांत घेऊन गेली. नियोजन मंडळाचा निधीचा मुद्दा थेट न्यायालयात गेल्याने त्यातील तथ्यांश तेथेच स्पष्ट होईलच. मात्र या संघर्षात सुहास कांदे याना राज्यभरातून सहानुभूती मिळाली. त्यामुळे हा संघर्ष आता कोणत्या वळणाने जाणार याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. नांदगाव मतदार संघातील सर्व सत्ता केंद्रे आमदार सुहास कांदे यांच्या प्रभावाखाली आहेत. कधीकाळी भुजबळ कँप्स मध्ये वावरणारी स्थानिक भूमिपुत्र कांदे यांच्या सोबत आहेत मतदार संघात राष्ट्रवादीला स्पेस हवाय मात्र समर्थक नाहीत अशा स्थितीत कांदे यांची कोंडी करून एकदा त्यांना खिंडीत गाठले की पुढील राजकीय लढाई सोपी असा एकूण हिशेब दिसतो. मात्र मूलतः आक्रमक असलेल्या कांदे यांना जनतेने स्वीकारले असल्याने त्यांच्या विरुध्दचे प्रयोग फारसे उपयोगी ठरणार नसल्याचे गृहीत धरून निधीची चणचण उभी केली गेल्याची शक्यता येथील राजकीय वर्तुळात चर्चिली जात आहे. मात्र नेमका हाच मुद्दा न्यायालयात गेल्याने त्याठिकाणी कोणता निर्णय लागतो यावर आगामी राजकीय लढाया निर्णायक ठरणार आहे