बँकांकडे तब्बल १६३ कोटी रुपयांच्या ठेवी पडून… त्यात तुमची तर नाही ना? फक्त हे करा, लगेच मिळतील पैसे…
दावा न केलेल्या ठेवी परत मिळवण्यासाठी विशेष मोहिमेचे आयोजन ; बँकनिहाय ठेवींची रक्कमही जाणून घ्या
अहिल्यानगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिल्ह्यातील विविध बँकांमधील वैयक्तिक, संस्थात्मक आणि सरकारी योजनांच्या खात्यांमध्ये सुमारे १६३ कोटी रुपयांची दावा न केलेली ठेवी शिल्लक आहे. या ठेवींचा ९ लाख ४ हजार २८१ खातेदारांना परतावा मिळविण्यासाठी १ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत जिल्हा अग्रणी बँक – सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांच्या पुढाकाराने आणि सर्व सदस्य बँकांच्या सहकार्याने विशेष मोहिम राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक आशिष एम. नवले यांनी दिली.
देशभरात विविध बँकांमध्ये सुमारे १ लाख ३५ हजार कोटी रुपयांची दावा न केलेली ठेवी शिल्लक आहेत. त्यापैकी महाराष्ट्र राज्यात ५ हजार ८६६ कोटी रुपये असून, त्यात वैयक्तिक खात्यांच्या ठेवी ४ हजार ६१२ कोटी, संस्थांच्या ठेवी १ हजार ८२ कोटी, आणि सरकारी योजनांमधील ठेवी १७२ कोटी रुपये समाविष्ट आहेत.
जिल्ह्यातील काही बँकांमधील दावा न केलेल्या ठेवींची माहिती खालीलप्रमाणे आहे:
एडीसीसी बँक: ७१ कोटी ५४ लक्ष (५.९९ लाख खाती)
स्टेट बँक ऑफ इंडिया: ३० कोटी २८ लक्ष (०.७९ लाख खाती)
सेंट्रल बँक ऑफ इंडिया: १३ कोटी ९५ लक्ष (०.६६ लाख खाती)
युनियन बँक ऑफ इंडिया: १२ कोटी १५ लक्ष (०.४८ लाख खाती)
बँक ऑफ महाराष्ट्र: ९ कोटी ८ लक्ष (०.२४ लाख खाती)
पैसे मिळविण्यासाठी फक्त हे करा
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमानुसार, १० वर्षांपासून निष्क्रिय असलेल्या खात्यांतील ठेवी ‘ठेवीदार शिक्षण आणि जागरूकता निधी’ (Depositor Education and Awareness Fund – DEAF) मध्ये हस्तांतरित केल्या जातात. तथापि, खातेदारांना आपले पैसे परत मिळवण्याचा पूर्ण हक्क आहे. ठेवी परत मिळविण्यासाठी संबंधित खातेदारांनी आपल्या बँकेत संपर्क साधून आवश्यक कागदपत्रे आणि अद्ययावत KYC सादर करणे आवश्यक आहे.
या मोहिमेद्वारे सर्व बँकांकडून जनजागृती शिबिरे आणि ग्राहक भेटी आयोजित केल्या जातील. खातेदारांनी या संधीचा नक्की लाभ घ्यावा, असे कळविण्यात आले आहे.