मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – एटीएम मशीन ही ग्राहकांना सेवा देणारे यंत्र असेच तुम्हाला वाटत असेल तर ते साफ चुकीचे आहे. हो. तुम्ही बरोबर वाचले आहे. एटीएम हे त्या त्या बँकेसाठी चक्क सोन्याची कोंबडी देणारी असल्याचे स्पष्ट होत आहे. कारण, सरकारी मालकीच्या पंजाब नॅशनल बँकेने (PNB) केलेली कमाई जाणून घ्याल तर तुम्हीही थक्क व्हाल. गेल्या आर्थिक वर्षात म्हणजेच २०२१-२२मध्ये बँकेने ग्राहकांकडून एटीएम व्यवहार शुल्कातून तब्बल ६४५ कोटी रुपये कमावले आहेत. बँकेने माहितीच्या अधिकारात (आरटीआय) ही माहिती दिली आहे.
बँकेने सांगितले की, गेल्या आर्थिक वर्षात ग्राहकांकडून एटीएम व्यवहार शुल्क म्हणून ६४५.६७ कोटी रुपये कमावले आहेत. याशिवाय, देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकेने तिमाही / मासिक आधारावर खात्यांमध्ये किमान शिल्लक न ठेवणाऱ्या ग्राहकांकडून एकूण २३९.०९ कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे. मध्य प्रदेशातील आरटीआय अर्जदार मनोज गौर यांच्या अर्जावर बँकेने ही माहिती दिली आहे.
२०२० – २१ या आर्थिक वर्षात बँकेने खात्यात किमान शिल्लक न ठेवलेल्या ग्राहकांकडून दंड म्हणून १७० कोटी रुपये कमावले होते. ही रक्कम २०२१ – २२ या आर्थिक वर्षात ८५,१८,९५३ खात्यांमधून उभारण्यात आली. तसेच, शून्य शिल्लक असलेल्या खात्यांच्या संख्येबद्दलच्या प्रश्नावर, पंजाब नॅशनल बँकेने सांगितले की ३१ मार्च २०२२ पर्यंत अशी एकूण ६,७६,३७,९१८ खाती होती. २०१८ – १९ ते २०२१ – २२ या मागील चार आर्थिक वर्षांच्या ट्रेंडनुसार, या वर्षांत पीएनबीमध्ये शून्य शिल्लक खात्यांमध्ये सातत्याने वाढ झाल्याचे समोर आले आहे. ३१ मार्च २०१९ पर्यंत, पीएनबीकडे २,८२,०३,३७९ शून्य शिल्लक खाती होती, जी मार्च २०२० अखेर ३,०५,८३,१८४ आणि ३१ मार्च २०२१ रोजी ५,९४,९६,७३१ झाली.