इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
दहशतवादी पाकिस्तानचा कणा मोडण्यासाठी सुरू करण्यात आलेले ऑपरेशन सिंदूर अद्याप थांबलेले नसतांना आशिया कपमध्ये १४ सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तानचा सामना होणार आहे. आता या सामन्याच्या दिवशीच शिवसेना ठाकरे गटाने माझं कुंकू – माझा देश आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे हा सामना रद्द करण्यासाठी उर्वशी जैन यांच्या नेतृत्वाखाली चार कायदयाच्या विदयार्थ्यांनी जनहित याचिका दाखल केली. त्यात तात्काळ सुनावणी करण्याची मागणी करण्यात आली. पण, सर्वोच्च न्यायालयाने तात्काळ सुनावणी घेण्यास नकार देत ही याचिका फेटाळून लावली. त्यामुळे भारत -पाकिस्तानचा सामन्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानसोबत क्रिकेट मॅचच्या आयोजनातून राष्ट्रीय प्रतिष्ठा आणि जनभावनेच्या विरोधात संदेश जातो असा मुद्दा याचिकाकर्त्यांनी मांडला होता. पण, न्यायालयाने याचिका फेटाळून लावली.
तर दुसरीकडे शिवसेनेची माहिला आघाडी १४ तारखेला रस्त्यावर उतरणार आहे. सिंदूर के सन्मान मै, शिवसेना मैदान मै असे हे आंदोलन असणार आहे. मोदींना महिला सिंदूर पाठवतील. ते अभियान सुध्दा राबवणार आहोत. या मॅचचा निषेध शिवसेना ठाकरे पक्ष करेल.
शिवसेनेच्या आंदोलनाबाबत खासदार संजय राऊत म्हणाले की, पहलगाम दहशवादी हल्ल्यात २६ निरपराध लोक मारले गेले. त्यांच्या कुटूंबाचा आक्रोश आम्ही अजूनही पाहतोय. ऑपरेशन सिंदूर सुरु आहे असे म्हणताय, पाकिस्तानचे कंबरडे मोडू असे पंतप्रधान आणि संरक्षण मंत्री म्हणाले. खून आणि पाणी एक साथ नहीं बहेगा असे देखील म्हणाले. आता खून आणि क्रिकेट एक साथ कसे असा प्रश्नही खा.राऊत यांनी उपस्थितीत केला. भारतीय जनता पक्ष, विश्व हिंदु परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं याबद्दल म्हणणं काय आहे ते त्यांनी सांगावं असे आव्हानही त्यांनी दिले.