इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
धनजंय मुंडे, माणिकराव कोकाटे यांचे रक्षण करणे हेच भाजपचे हिंदुत्त्व आहे काय? असा संतप्त सवाल काही दिवसांपूर्वी उध्दव ठाकरे यांनी करत भाजपवर निशाणा साधला होता. त्यानंतर आता राज्याचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट टाकत त्यात टीकाही केली आहे.
या पोस्टमध्ये शेलार यांनी म्हटले आहे की, अयोध्येत प्रभू रामाचे भव्य मंदिर उभे राहिले महाराष्ट्रातील ढोंगी हिंदुत्ववादी सोडले तर कोट्यवधी श्रध्दाळू दर्शन करुन आले. आमच्या छत्रपती संभाजी महाराजांवरील “छावा” सिनेमा आला महाराष्ट्रातील ढोंगी हिंदुत्ववादी सोडले तर जगभरातील कोट्यवधी लोकांनी तो पाहिला. “छावा” वर महाराष्ट्रातील ढोंगी हिंदुत्ववादी आणि त्यांचा “सामना” सोडून जगभरातील लिहिणारे, बोलणारे बोलत आहेत.. स्वागत करीत आहेत. कुंभमेळा भरला.. महाराष्ट्रातील ढोंगी हिंदुत्ववादी सोडले तर जगभरातील कोट्यवधी भाविक सहभागी होऊन पवित्र स्नान करुन आले.
सभेत दाखवण्यापुर्ती हातात रुद्राक्षाची माळ घाली औरंगजेबाचा जप ज्यांच्या सदैव तोंडी… ओळखलेत का? महाराष्ट्रातील ते हिंदुत्ववादी ढोंगी ? असा प्रश्नही पोस्टमध्ये नाव न घेता केला आहे.