नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- लोकसभा निवडणुकीनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीला एकामागून एक धक्के बसत आहेत. आता आगामी बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘आम आदमी पक्षा’ने स्वबळावर सर्व जागांवर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. ‘आप’चे नेते सौरभ भारद्वाज यांनी बुधवारी ही माहिती दिली. यामुळे ‘इंडिया’ आघाडीला आणखी एक धक्का मानला जात आहे.
भारद्वाज म्हणाले, की गुजरातमध्ये पाच जागांवर पोटनिवडणुका होणार होत्या, त्यापैकी काँग्रेसने जिंकलेल्या चार जागा होत्या, तर एक जागा आम्ही जिंकलेली होती. जिथे त्यांचा उमेदवार जिंकला होता, तिथे ते निवडणूक लढवतील आणि जिथे आमचा उमेदवार जिंकला होता, तिथे आम्ही निवडणूक लढवू, असे ठरले होते. त्यांच्या चार जागांवर आम्ही निवडणूक लढवली नाही; पण जेव्हा पाचव्या जागेसाठी पोटनिवडणूक झाली, तेव्हा काँग्रेसने आपला उमेदवार उभा केला. मला वाटते, की हा युतीचा धर्म नाही. बिहारमध्ये आम्ही स्वबळावर निवडणूक लढवत आहोत; पण शेवटी पक्षातील मोठे नेते जो काही निर्णय घेतील, तो आम्ही मान्य करू.
ते पुढे म्हणाले, की दिल्लीमध्ये ज्या पद्धतीने बिहारमधील लोकांचा रोजगार उद्ध्वस्त केला जातो. त्यांची घरे बुलडोझरने पाडली जात आहेत. असे म्हणता येईल, की बिहारमधील लोकांना बिहारमध्ये परत हाकलून लावले जात आहे. जर भारतीय जनता पक्ष बिहारमधील लोकांना हाकलून लावू शकतो, तर बिहारमधील लोक भारतीय जनता पक्षाला राज्यातून हाकलून लावू शकतात. भारतीय जनता पक्षाचे धोरण खोटे बोलणे आहे. भाजपवाले खोट्या गोष्टी वारंवार सांगतात. त्यामुळे तुमचा खोट्यावर विश्वास बसतो. ३१ मे रोजी सरकारला शंभर दिवस पूर्ण झाल्यावर मुख्यमंत्री रेखा गुप्ता म्हणाल्या होत्या, की एकही झोपडपट्टी पाडली जाणार नाही; पण दुसऱ्याच दिवशी मद्रासी कॅम्पमध्ये सुमारे ८०० झोपडपट्ट्या पाडल्या गेल्या, हे भाजपचे धोरण आहे, अशी टीकाही भारद्वाज यांनी या वेळी केली.