गुरु विना कोण दाखवील वाट
– सौ. शीतल अमृतकार (डांगसौंदाणे, ता. सटाणा, जि. नाशिक)
आज गुरु पौर्णिमा म्हणजेच गुरु बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. गुरुपौर्णिमा हा सण हिंदू कॅलेंडरनुसार आषाढ शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी साजरा करतात. महर्षी व्यास यांच्या स्मरणार्थ गुरुपौर्णिमा साजरी केली जाते म्हणून या पौर्णिमेला व्यास पौर्णिमा असेही म्हटले जाते. कारण ‘महाभारत’ या महान ग्रंथाचे रचयिता महर्षी व्यासांचा जन्म याच पौर्णिमेला झाला होता.
भारतीय संस्कृतीत प्राचीन काळापासून गुरूला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. `गुरु’ या शब्दाचा अर्थ आहे- ‘अज्ञानरूपी अंधाराला दूर करून ज्ञानरूपी प्रकाशाकडे घेऊन जाणारा प्रकाश पुंज` म्हणजेच गुरु आपल्यातील अज्ञान, दोष दूर करतो व ज्ञानाचा, सदगुणांचा संचार करतो जसे कुंभार मातीच्या गोळ्याला आकार देऊन सुंदर कलाकृती/ मूर्ती घडवतो तसेच गुरु सुद्धा मानवरुपी देहाला आपल्या संस्कारांनी, विचारांनी एक चारित्र्यवान व्यक्तिमत्व घडवतो. अर्थात, गुरु हे मनुष्याच्या मनाला, विचारांना आकार देण्याचे कार्य करतो.
गुरुपौर्णिमा हा सण शाळा, महाविद्यालये तसेच इतर क्षेत्रांमध्ये देखील मोठ्या आनंदात साजरा करतात. या दिवशी प्रत्येक शिष्य हा त्याच्या गुरुने त्याच्यासाठी घेतलेल्या कष्टांची, मेहनतीची, ज्ञानाच्या शिक्षेबद्दल आठवण करून गुरुंबद्दल आपली श्रद्धा, निष्ठा, आभार व्यक्त करतो. मनुष्याला जीवनात वेगवेगळे गुरु मिळतात. त्याचा प्रथम गुरु म्हणजे माता —पिता. जे की आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी कष्ट, हाल —अपेष्टा सहन करून त्याला आपल्या पायावर उभे करतात. लहानपणापासून आपले संगोपन करतात, चांगले विचार शिकवतात.
समाजामध्ये ताठ मानेने आपण जगावे म्हणून धडपड करत असतात. म्हणून मनुष्याचा प्रथम गुरु म्हणजेच आई— वडील अर्थात माता— पिता. द्वितीय गुरु म्हणजे प्राचीन काळातील गुरुकुलातील आचार्य, गुरु अर्थात आधुनिक काळातील शिक्षक. हे शिक्षक म्हणजेच गुरु आपल्या विद्यार्थ्यांची(शिष्यांची) ज्ञानदानाने जडण—घडण करतात. आपल्या शिष्याने भविष्यात एक चांगला व्यक्ती म्हणून स्थान निर्माण करण्यासाठी त्याच्या उज्वल भविष्यासाठी कष्ट घेतात. इतकेच नव्हे तर मनुष्याला आयुष्याच्या वाटेवर वेगवेगळे गुरु मिळतात. ज्यांचे मार्गदर्शन मिळून आपले जीवन सार्थक होते, प्रगतीपथावर जाते.
गुरु आपल्या शिष्याला शाश्वत ज्ञान व कीर्ती देतात. पूर्वीपासून असे अनेक महान गुरु होऊन गेले ज्यांनी आपल्या शिष्यांना अशाप्रकारे ज्ञानाची शिकवण दिली की त्यांच्या शिष्यांनी स्वतःचे व त्यांच्या गुरूंचे नाव अमर केले. अशा अनेक गुरु— शिष्यांच्या जोड्या आपल्याला पाहायला मिळतात. त्या म्हणजे महर्षी विश्वामित्र—श्रीराम, महर्षी सांदीपनि—श्रीकृष्ण, गुरु द्रोणाचार्य—अर्जुन, आर्य चाणक्य—चंद्रगुप्त मौर्य, जिजाऊ—शिवाजी, रामकृष्ण परमहंस— स्वामी विवेकानंद इतकेच नव्हे तर आधुनिक काळातील दीनानाथ मंगेशकर—लता मंगेशकर, रमाकांत आचरेकर—सचिन तेंडुलकर अशाप्रकारे भारतीय संस्कृतीतील अशा अनेक गुरु— शिष्यांची परंपरा मिळते ज्यांनी विविध क्षेत्रांमध्ये आपले नाव कमावले आहे.
गुरु आपल्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश घेऊन येतात म्हणून भारतीय संस्कृतीत गुरूला ईश्वराचे स्थान दिले आहे. इतकेच नव्हे तर संत कबीर तर गुरूंना ईश्वरापेक्षाही श्रेष्ठ मानतात. त्यांच्या एका दोह्यामध्ये त्यांचे गुरुबद्दलचे उच्च स्थान दिसून येते —
”गुरुगोविंद दोउ खडे, काके लागू पाय|
बलिहारि गुरु आपने गोविंद दियो बताय||“
अर्थात संत कबीर म्हणतात की गुरु आणि गोविंद म्हणजेच ईश्वर दोघे उभे आहेत तर मनात असा प्रश्न निर्माण झाला की कोणाचे चरण प्रथम स्पर्श करू? तर कबीर पुढे म्हणतात की गुरूमुळेच मला ईश्वर काय आहे ते समजले म्हणून ईश्वरापेक्षाही माझे गुरु मोठे आहेत. अशा प्रकारे संत कबीरांच्या जीवनात गुरूंचे महत्त्व होते. त्यांनी गुरुमहिमेवर अनेक असे दोहे लिहिले आहेत की ज्यामुळे आपल्याला गुरुची महती म्हणजेच महत्त्व कळते.
मनुष्य हा सर्व प्राणीमात्रांमध्ये श्रेष्ठ समजला जातो, कारण माणसाजवळ विद्या आहे आणि ही विद्या देण्याचे काम गुरुच करतात. म्हणजेच, गुरु ही विद्येची खान आहे जी कधीच संपत नाही म्हणूनच गुरु शिवाय कोणीही महान म्हणजेच मोठे होण्याची कल्पना देखील करू शकत नाही. म्हणूनच आपण आपल्या गुरुजनांचा तसेच आई-वडिलांचा आदर व सन्मान केला पाहिजे, त्यांच्या आज्ञेचे पालन केले पाहिजे. यातूनच एका उत्तम चारित्र्याची निर्मिती होते. आपले, आपल्या कुटुंबाचे, गुरुचे व देशाचे नावलौकिक होते. कारण गुरु म्हणजेच ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणारा झरा असतो.
गुरु म्हणजेच निष्ठा, कर्तव्य, श्रद्धा, भक्ती, विश्वास, वात्सल्य, उत्तम आदर्श व प्रमाणतेचे मूर्तीमंत प्रतीक असतो. गुरु त्यांच्या जवळील ज्ञानातून, अनुभवातून शिष्याला मार्गदर्शन करतात. जे की जीवन जगत असताना याची प्रत्येक मनुष्याला गरज असते. त्यानुसार मनुष्य स्वतःच्या पायावर उभा राहतो, स्वतःची प्रगती करतो. म्हणूनच, आपण नम्र होऊन गुरूंपासून विकीर्ण होणाऱ्या ज्ञानकणांना वेचले पाहिजे व ते आत्मसात केले पाहिजे कारण— `गुरु बिन कौन बतावे बाट` जगात अशी कोणतीच व्यक्ती सापडणार नाही की जी गुरु शिवाय मोठी झाली अर्थात नावलौकिक कमावले.
अनंत चांदण्यापेक्षा चंद्र मोठा आहे तर चंद्रापेक्षाही सूर्याचा प्रकाश मोठा आहे आणि सूर्याच्या प्रकाशापेक्षाही मोठा म्हणजे ‘गुरु’ आहे. जो सर्वत्र ज्ञानाचा प्रकाश पसरवतो आणि अज्ञानाचा अंधकार दूर करतो. मनुष्याची उत्तम पिढी निर्माण करण्याचे कार्य करतो. गुरुविना ज्ञान मिळत नाही आणि ज्ञानविना जगात सन्मान मिळत नाही. ज्ञानानेच सर्वत्र सन्मान होतो, ज्ञान नसेल तर कोणाचीच किंमत नाही आणि हे ज्ञान देण्याचे कार्य फक्त गुरुच करतो. म्हणूनच गुरु सागराप्रमाणे अथांग आहे.
गुरुमुळेच शिष्य (विद्यार्थी)वेगवेगळ्या क्षेत्रात आपले नावलौकिक करतो. म्हणूनच गुरूला उत्तम पिढी निर्माण करणारा कुंभार, शिल्पकार म्हटले जाते. कारण गुरूच आपल्यातील दुर्गुण, अज्ञान, दोष, दुर्बलता दूर करून आपल्यातील आत्मविश्वास निर्माण करून आपल्या स्वप्नांना जिंकायला यशाचे बळ देऊन सबळ बनवतात. म्हणूनच गुरु या शब्दामध्ये सर्व काही सामावले आहे.
इतकेच नव्हे तर गुरु— शिष्याचे नाते हे केवळ शिक्षणापुरतेच मर्यादित नसते तर गुरु शिष्याच्या मनातील वैचारिक गोंधळ दूर करून समाजाला, शिष्याला सकारात्मक दिशा दाखवण्याचे कार्य करतात. म्हणूनच, आयुष्य जगत असताना आपल्याला गुरुने शिकवलेले सदाचरण कायम लक्षात ठेवले पाहिजे आणि पुढच्या पिढीकडे संस्कारातून हस्तांतरित केले पाहिजे. हीच आपल्याकडून आपल्या गुरूला खरी गुरुदक्षिणा ठरेल.
आयुष्याच्या वाटेवर वेगवेगळे वळण येतात आणि या वळणावरून निश्चित वाट दाखवणारे गुरु भेटतात. प्रत्येकाकडून वेगवेगळे ज्ञान व नव—नवीन विचार शिकायला मिळतात आणि या गुरूंच्या शिकवणीला उजाळा देण्याचे व त्यांच्या प्रति आभार व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे ‘गुरुपौर्णिमा’ अशा या गुरूंच्या ऋणातून आपण कधीही मुक्त होऊ शकत नाहीत परंतु ‘गुरुपौर्णिमेच्या’ निमित्ताने आपण त्यांचे स्मरण करून हृदयात त्यांची आठवण त्यांची शिक्षा यांना उजाळा देऊन त्यांचे शतशः आभार व्यक्त करतो. गुरूंना ईश्वराचे स्थान देत वंदना करतो की —
”गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा|
गुरुर्साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरुवे नमः||”
अर्थात गुरुसृष्टी निर्माता ब्रह्मा समान आहे. गुरु संरक्षक विष्णू समान आहे. गुरुविनाशक महेशा समान आहे. अशा या साक्षात परब्रम्ह असणाऱ्या गुरूला शतशः नमन……