मुंबई – राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीची नोटीस पाठवण्यात आली आहे. मंगळवारी त्यांना हजर राहण्याचे आदेश दिले आहे. पण, या नोटीसमध्ये कोणतेही कारण दिले नसल्याचे परब यांनी सायंकाळी पत्रकारांशी बोलतांना सांगितले. केवळ ३१ ऑगस्टला हजर राहण्याचे सांगितले कायदेशीर सल्ला घेऊन उत्तर देईल. सुडबुद्धीने केले यावर काही बोलायचे नाही असेही त्यांनी सांगितले.
ही नोटीस आल्यानंतर शिवसेनेचे खा. संजय राऊत ट्विट केले होते. त्यात राऊत यांनी सांगितले की, शाब्बास !…जन आशीर्वाद जत्रेची सांगता होताच अपेक्षे प्रमाणे अनिल परब यांना ई.डी.ची नोटीस बजावण्यात आली. वरचे सरकार कामाला लागले. भुकंपाचा केंद्रबिंदू रत्नागिरीत होता. परब हे रत्नागिरीचे पालक मंत्री आहेत. chronology कृपया समज लिजीये. कायदेशीर लढाई कायदयानेच लढू..जय महाराष्ट्र
दरम्यान ही नोटीस १०० कोटी वसुली प्रकरणातील असल्याचे बोलले जात आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक प्रकरणात परब यांच्या फोनवरील संभाषण व्हायरल झाले होते. त्यानंतर त्याची थेट दखल केंद्राने घेतल्याचेही बोलले जात होते. आज राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेचा समारोप सकाळी झाल्यानंतर काही तासात परब यांना नोटीस मिळाली. त्यामुळे हे सूडाचे राजकारण असल्याचा आरोप शिवसेनेचे नेते करत आहे.