सुदर्शन सारडा
नाशिक: विधानमंडळात निफाड तालुक्याचे दोन वेळेला प्रतिनिधत्व केलेले शिवसेना (उबाठा) चे नेते माजी आमदार अनिल कदम यांच्या भाजप प्रवेशाची वार्ता खोटी असल्याचे कदम यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे निफाडच्या परिघात सुरू झालेले राजकीय भूकंपाचे धक्के आता सौम्य झाले असून काही तासांत चर्चांचा रीस्टर स्केल शून्यावर येईल.
एका वृत्त वहिनीने सेना नेते अनिल कदम भाजप प्रवेश करणार अशी ब्रेकिंग झळकल्यावर निफाडसह नाशिक जिल्ह्यात चर्चेचे वारे वेगाने वाहू लागले सोशल मीडियावर सदर वार्ता पसरवू लागल्यावर दुपारी बाराच्या कडक उन्हात डबल उष्णता निर्माण झाली होती. अखेरीस अनिल कदम यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सदर वृत्त खोटे असल्याचे सांगत आपण बाळासाहेब ठाकरेंचे आणि उद्धव ठाकरे यांचे निष्ठावंत शिवसैनिक असून मातोश्रीशी माझी नाळ कायम असल्याचे स्पष्ट केले.खरेतर अनिल कदम हे उद्धव ठाकरेंचे अत्यंत जवळचे मानले जातात.
काही आठवड्यांपूर्वी त्यांच्या काही शिलेदारांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. तेव्हाही त्यांनी जाणाऱ्यांना शुभेच्छा म्हणत तालुक्यातील जनसामान्य लोकांना सोबत घेऊन तालुक्यातील नागरिकांचे प्रश्न मांडत त्यांना न्याय मिळवून देईल असे सांगितले होते.राज्यभर सुरू असलेले राजकीय इन्कामिंग आउटगोइंगमुळे अनिल कदम यांच्या प्रवेशाच्या बातमीने नाशिक जिल्ह्यात राजकीय जाणकारांना काही वेळापुरता शॉक लागला खरा पण निष्ठेशी गद्दारी नाही असे म्हणत अनिल कदमांनीच सदर वार्ताला पूर्णविराम दिल्याने झळकलेली भाजप प्रवेशाची बातमी खोटी असल्याचे स्पष्ट झाले आहे.