मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- आज मुंबई उच्च न्यायालयाच्या सुट्टीच्या न्यायाधीश गौरी गोडसे व न्यायाधीश सोमशेखर सुंदरेसन या खंडपीठाने कृती समितीचे वकील ॲड सुधा भारद्वाज यांचे संपूर्ण म्हणणे ऐकून घेतले व २०१४ सालच्या नोटिफिकेशनला ग्राह्य धरून १० वर्षे अनुभव असलेल्या १२ वी पास व ५० वयोमर्यादेतील अंगणवाडी सेविकांना मुख्य सेविकापदी होणाऱ्या निवडीसाठी पात्र धरून त्यांना अर्ज दाखल करण्यासाठी प्रकल्प अधिकाऱ्यांनी दाखले द्यावेत असा आदेश दिला.
हा आदेश महाराष्ट्रातील तमाम सेविकांना लागू होईल. ॲड सुधा भारद्वाज यांच्या बरोबर कृती समितीच्या प्रतिनिधी ॲड. आरमायटी इराणी या दोन्ही दिवस कोर्टात उपस्थित होत्या व त्यांनी सर्व प्रकारचे सहाय्य केले. हा अंतरिम आदेश असून प्रत्यक्ष नेमणुका कृती समितीने दाखल केलेल्या याचिकेच्या अंतिम निकालानुसार कराव्या लागणार आहेत.
कृती समितीने २००२ सालच्या नोटिफिकेशननुसार १० वी पास व ५५ वयोमर्यादा मागितली होती व शासन मात्र पदवीधर, ४५ वयोमर्यादा, १० वी किंवा १२ वीला हिंदी विषय आणि MS-CIT यावर अडून होते. परंतु उच्च न्यायालयाने हा मध्यम मार्ग काढला असावा असे दिसते. आता मोठ्या संख्येने सेविकांना स्पर्धेत उतरणे शक्य होणार आहे. कृती समिती ॲड गायत्री सिंग, ॲड सुधा भारद्वाज, ॲड संजोत शिरसाट, ॲड हामझा लाकडावाला या टीमचे मनापासून आभार मानत आहे.
कृती समिती तर्फे एमए पाटील, शुभा शमीम, दिलीप उटाणे,कमल परुळेकर, भगवानराव देशमुख, जीवन सुरुडे, जयश्री पाटील यांनी पाठपुरावा केला.