इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – भारतातील नव्हे तर जगातील अत्यंत कठीण समजली जाणारी जाणारी बाबा अमरनाथ यांची यात्रा येत्या पंधरा दिवसात म्हणजे 30 जून पासून सुरू होणार असून या यात्रेची तयारी शासकीय स्तरावर युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र त्यासाठी काही कठोर आणि कडक नियम करण्यात आले आहेत.
अमरनाथ यात्रेत सहभागी होण्यासाठी भाविकांकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे, अन्यथा ते बाबा बर्फानीच्या दर्शनापासून वंचित राहू शकतात. त्यामुळे ज्यांच्याकडे आधारकार्ड नाही, त्यांनी ते बनवून नंतर प्रमाणित करून घेणे आवश्यक आहे. या संदर्भात जम्मू-काश्मीर प्रशासनाने सोमवारी एक अधिसूचना जारी केली आहे. यात्रेला येणाऱ्या भाविकांना विविध सेवा देण्यासाठी बालटाल आणि नुनवान (पहलगाम) येथे या वर्षी ३५ हजार कामगारांची नोंदणी केली जाणार आहे.
अमरनाथ यात्रा करू इच्छिणाऱ्या यात्रेकरूंनी आधारचा पुरावा सादर करावा किंवा स्वेच्छेने आधार प्रमाणीकरण करावे लागेल. एवढेच नाही तर यात्रेकरूंना घोडा-खेचर सेवा देणाऱ्यांना रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन डिव्हाईस (आरएफआयडी) कार्ड दिले जाणार आहेत. अमरनाथ यात्रा 30 जूनपासून सुरू होणार असून 11 ऑगस्टला रक्षाबंधनाच्या दिवशी संपणार आहे.
मंगळवारी ज्येष्ठ पौर्णिमेला श्री अमरनाथ गुहेत पवित्र हिमलिंगाच्या रूपात विराजमान असलेल्या भगवान शंकराची पहिली पूजा करण्यात आली. यामध्ये श्री अमरनाथ बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीश्वर कुमार यांच्यासह मंडळाचे इतर अधिकारी आणि श्री अमरनाथ यात्री ट्रस्टचे अधिकारी सहभागी झाले. बोर्डातर्फे दरवर्षी ज्येष्ठ पौर्णिमेला यात्रेच्या प्रारंभापूर्वी पवित्र गुहेत भगवान शंकराचे हवन आणि पूजेचे आयोजन केले जाते.
श्री अमरनाथ यात्रा सुरू होण्यास आता 20 दिवसांपेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. यावेळी, श्रीनगरमधूनच हेलिकॉप्टर सेवा सुरू करण्यासह प्रवास सुरळीत करण्यासाठी अनेक पावले उचलली जात आहेत, परंतु बहुतेक भाविकांना त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला दिला जात आहे. यात्रेसाठी केवळ आरोग्य प्रमाणपत्र हे आरोग्याची हमी कार्ड म्हणून भाविकांनी गैरसमज करून घेऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. प्रवासाला येण्यापूर्वी या दुर्गम मार्गांवर चालण्यासाठी शरीराला तयार करा, असे डॉक्टर सांगतात.
राज्य सरकारच्या अधिसूचनेमध्ये, सुशासन (समाज कल्याण ) नियम, 2000 च्या उपनियम 5 अंतर्गत अमरनाथ यात्रेला येणाऱ्या यात्रेकरूंसाठी आधार प्रमाणीकरण आवश्यक असल्याचे म्हटले आहे. भक्तांना त्यांच्या आधार कार्डचा पुरावा सादर करावा लागेल किंवा त्यांना स्वेच्छेने त्यांचे आधार प्रमाणित करून घ्यावे लागेल. श्री अमरनाथ बोर्डाला आधार प्रमाणीकरणाबाबत केंद्र सरकारने जारी केलेल्या सूचनांचे पालन निश्चित करण्यास सांगितले आहे.
राज्य प्रशासनाने सूरज प्रकाश, विशेष सचिव, आपत्ती व्यवस्थापन, मदत, पुनर्वसन विभाग, यांना श्री अमरनाथ बोर्डमधील आपत्ती व्यवस्थापन आणि संबंधित कामांसाठी नोडल अधिकारी म्हणून नियुक्त केले आहे जेणेकरून कोणत्याही अडचणी उद्भवू नयेत. याशिवाय त्यांना मदत करण्यासाठी तहसीलदार लताफत कादिर आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचे सल्लागार वसीम शफीदार यांची जिल्हा मदत आणि पुनर्वसन कार्यालय, श्रीनगरचे उपायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
बालटाल, नुनवान आणि पवित्र गुहेजवळ आजारी रुग्ण व प्राण्यांच्या उपचारासाठी रुग्णालयेही बांधण्यात आली आहेत. यात्रा मार्गावर अनेक ठिकाणी मोबाईल टॉयलेटही उपलब्ध असतील. बालटाल आणि नुनवानमध्ये स्वच्छता योजनेसह कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची व्यवस्था करण्यात येत आहे.
सर्व 45 शिबिर संचालकांची कार्यशाळा देखील सोमवारी डलगेट, श्रीनगर येथील पर्यटक स्वागत केंद्रात संपली. यामध्ये अमरनाथ यात्रेच्या तयारीवर चर्चा करण्यात आली. सार्वजनिक बांधकाम रस्ते व इमारत बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता यांनी यात्रा मार्गावरील रस्ते, पूल, शेड, पदपथ यांच्या सद्यस्थितीबाबत माहित केले. मुख्य अभियंता, काश्मीर ऊर्जा वितरण निगम यांनी यात्रेकरूंच्या छावण्या आणि पवित्र गुहेत विद्युत पुरवठ्यासाठी बसविण्यात येत असलेल्या ट्रान्सफॉर्मर आणि ट्रान्समिशन लाइनची माहिती दिली. जलशक्ती विभागाने पिण्याच्या पाणी पुरवठा व्यवस्थेबाबत सांगितले.
श्राइन बोर्डचे सीईओ नितीश्वर कुमार यांनी बालटालमधील प्रवासाच्या मार्गाचे हवाई सर्वेक्षण केले. सुमारे 700 खाटांच्या क्षमतेचे डीआरडीओ रुग्णालय, लंगर, सुरक्षा व्यवस्थाही त्यांनी तपासली. त्यांनी टेंट सिटीलाही भेट दिली. टेंट सिटीमध्ये सुमारे 800 तंबू उभारले जात आहेत. गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आर के गोयल यांनी सांबा आणि कठुआ येथील प्रवासाची व्यवस्था तपासली. एकूण 8,000 यात्रेकरूंच्या राहण्यासाठी सुमारे 53 केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत.