इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – जम्मू-काश्मीरमधील अमरनाथच्या पवित्र गुहेजवळ ढगफुटी झाली आहे. या घटनेतील मृतांची संख्या १० झाली आहे. तर ४० जण अद्याप बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. जखमींना उपचारासाठी विमानाने हलवण्यात येत आहे. एनडीआरएफ, आयटीबीपी आणि एसडीआरएफच्या तुकड्या घटनास्थळी आहेत. मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच हवामान खात्याने अमरनाथमध्ये खराब हवामानाचा अंदाज वर्तवला होता. या घटनेवर पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान आणि शाह यांनी जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांच्याशी चर्चा केली आहे.
https://twitter.com/ANI/status/1545404025503625217?s=20&t=TTYFO6fxN5enI_H7GnlOMA
वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, अमरनाथ गुहेपासून दोन किलोमीटर अंतरावर ढगफुटीची घटना घडली. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास सखल भागात ढगफुटी झाल्याचे सांगण्यात येत आहे. अमरनाथ गुहेनंतर झालेल्या ढगफुटीच्या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांप्रती पंतप्रधान मोदींनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. एका ट्विटमध्ये त्यांनी सांगितले की, मदतकार्य सुरू आहे. लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांच्याशी बोलून त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. पंतप्रधान मोदींशिवाय गृहमंत्री अमित शहा यांनीही नायब राज्यपालांशी फोनवर बोलून बचाव कार्याची माहिती घेतली.
आयजीपी काश्मीर यांनी सांगितले की, ढगफुटीनंतर पवित्र गुहेजवळील काही लंगर आणि तंबूंना पुराचा फटका बसला. एनडीआरएफचे डीजी अतुल करवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत 10 जणांच्या मृत्यूची अधिकृत पुष्टी झाली आहे. तिघांची जिवंत सुटका करण्यात आली. तर 40 जण अद्याप बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिस, एनडीआरएफ आणि इतर यंत्रणांकडून बचावकार्य सुरू आहे. जखमींना उपचारासाठी विमानाने हलवण्यात येत आहे. परिस्थिती नियंत्रणात आहे. आयटीबीपीचे म्हणणे आहे की, काही जीवितहानी होण्याची शक्यता आहे, अद्याप कोणतीही स्पष्टता नाही. बचाव पथके कामावर आहेत. इतर एजन्सीसह ITBP टीम बचाव कार्यात आहेत.