नाशिक – आदिवासी विकास विभागाच्या 14 डिसेंबर 2021 रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्यातील कोविडमूक्त क्षेत्रात ‘चला मुलांनो शाळेत चला’ या मोहिमे अंतर्गत आज 15 डिसेंबर 2021 पासून सर्व आश्रमशाळेतील इयत्ता 1 ली ते 4 थी चे वर्ग योग्य त्या कोविड प्रतिबंधात्मक नियमांसह पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचा निर्णय राज्याचे आदिवासी विकास विभाग मंत्री अॅड. के.सी. पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला आहे, अशी माहिती आदिवासी विकास आयुक्तालयाचे आयुक्त हिरालाल सोनवणे यांनी शासकीय प्रसिद्धीपत्रकान्वये दिली आहे.
शासकीय प्रसिद्धीपत्रकात नमुद केल्यानुसार, मुलांनी शाळेत यावे यासाठी ‘चला मुलांनो शाळेत चला’ ही मोहिम सर्वच आश्रमशाळांमध्ये राबविण्यात येणार आहे. आश्रमशाळा या निवासी असल्याने विद्यार्थी शाळेतच राहत असतात. यामुळे आपल्या पाल्याला शाळेत किंवा वसतिगृहात पाठवण्यापूर्वी पालकांचे संमतीपत्र सर्वच आश्रमशाळा व वसतिगृह यांना घेणे बंधनकारक असणार आहे. शाळा सुरु करतांना ग्रामीण स्तरावर ज्या गावात मागील एक महिन्यात एकही कोविड रूग्ण आढळून आला नाही, अशा ठिकाणी पालकांशी चर्चा करून शाळा सुरू करण्याबाबत तसेच शाळा सुरु करण्यापूर्वी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी किमान लसीकरणाचा पहिला डोस पूर्ण केलेला असावा व दुसरा डोस त्वरीत घेणेबाबत सूचित करण्यात आले आहे.
कोरानाच्या पार्श्वभूमीवर आश्रमशाळांमध्ये भोजनव्यवस्था, निवासव्यवस्था तसेच योग्य ते शारीरिक अंतर ठेवणे आवश्यक आहे. यासाठी आदिवासी विकास मंत्री अॅड. के.सी. पाडवी, आदिवासी विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे आणि आदिवासी विकास विभागाचे सचिव अनुपकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली आदिवासी विकास विभागाने शाळा आणि वसतिगृहे सुरु करण्यापुर्वी व सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत मार्गदर्शक सूचनाही निर्गमित केल्या आहे.
शाळा आणि शाळेतील वसतिगृह सुरू करण्यापुर्वीच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी संपूर्ण आश्रमशाळेचा तसेच वसतिगृह यांचा परिसर स्वच्छ आणि निर्जंतूक करावा. गर्दी होणार नाही यादृष्टीने विविध समित्या गठीत करून त्यांचे कार्य ठरवावे. विद्यार्थ्यांची वर्गातील बैठक व्यवस्था तसेच निवासव्यवस्था यांचे योग्य नियोजन करणे, शारीरिक अंतर राखणे याबाबतच्या खुणा, चिन्हे आश्रमशाळेत व वर्गात लावणे आणि शाळा सुरू झाल्यावर सर्वांनी एन 95 मास्क लावणे बंधनकारक आहे, अशा सूचनाही आदिवासी आयुक्त हिरालाल सोनवणे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून दिल्या आहेत.
आश्रमशाळा आणि वसतिगृहे सुरु झाल्यानंतर विद्यार्थ्यांची स्वच्छता आणि सुरक्षितता ठेवणे, शालेय वेळापत्रक बनवणे, भोजनवेळेचे नियोजन करणे , विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षित शारीरिक अंतराचे पालन करणे तसेच संशयित किंवा कोविडबाधित आढळल्यास योग्य ती दक्षता घेणे या बाबत देखील सूचना देण्यात आल्या आहेत. यासोबतच विद्यार्थ्यांच्या समुपदेशनाची महत्त्वपूर्ण जबाबदारी मुख्याध्यापक, शिक्षक, अधिक्षक-अधिक्षिका आणि गृहपाल यांच्यावर असणार आहे, असेही आदिवासी विकास आयुक्त श्री. सोनवणे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकामार्फत कळविले आहे.