मुंबई – ‘काही जणांच्या जीभेला हाड नसते’ असे म्हटले जाते. सध्या काही जणांच्या बाबतीत हे खरे असावे. कारण वादग्रस्त वक्तव्य करून ही मंडळी आपल्या बौद्धिक दिवाळखोरीचे प्रदर्शन करत असतात. एका अभिनेत्री बाबतीत देखील असेच म्हटले जाते. कारण वारंवार वादग्रस्त वक्तव्य करून ही अभिनेत्री सर्वांचे लक्ष आपल्याकडे वळू पाहते. वास्तविक संबंधित विषयाबद्दल मत व्यक्त करताना त्या विषयाचा तिचा किती अभ्यास आहे? अशी विचारणा आता होत आहे.
सुमारे ४ दिवसापुर्वी वादग्रस्त विधान करून वाद निर्माण करणाऱ्या अभिनेत्री कंगना राणौतने पुन्हा एकदा महात्मा गांधी यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्याने इंस्टाग्राम स्टोरीजवर लांबलचक संदेश पोस्ट केले आहेत. या पोस्टमध्ये महात्मा गांधींवर निशाणा साधण्यात आला आहे. पहिल्या मेसेजमध्ये कंगनाने, महात्मा गांधी यांना सत्तेची भूक आणि धूर्त असे वर्णन केले आहे, तर दुसऱ्या पोस्टमध्ये भगतसिंग यांना फाशी द्यावी, अशी गांधीजींची इच्छा होती, असे लिहिले आहे.
तसेच कंगनाने नागरिकांना त्यांच्या मनातील हिरोची (थोर व्यक्तीची) निवड हुशारीने करण्याचा सल्ला दिला आहे. ‘थप्पड मारणाऱ्यासमोर दुसरा गाल फिरवल्याने स्वातंत्र्य मिळत नाही, ‘ असेही त्यांनी लिहिले आहे. वास्तविक कंगना राणौतच्या मागील विधानावरचा गदारोळ अजूनही थांबलेला नाही तोच तिने आणखी काही आक्षेपार्ह पोस्ट केल्या आहेत.
कंगनाने आणखी एका पोस्टमध्ये लिहिले आहे की, गांधींनी कधीही भगतसिंग आणि नेताजींना पाठिंबा दिला नाही. भगतसिंगांना फाशी द्यावी, अशी गांधीजींची इच्छा होती, असे अनेक पुरावे आहेत. त्यामुळे आता तुम्ही कोणाला पाठिंबा द्याल ते तुम्हाला ठरवावे किंवा निवडावे लागेल. कारण त्या सर्वांना आपल्या स्मृतीच्या एकाच पेटीत ठेवून त्यांच्या जयंतीदिनी त्यांचे स्मरण करणे पुरेसे नाही, खरे सांगायचे तर ते मूर्खपणाचे असून बेजबाबदार आणि वरवरचे आहे. भारतीय जनतेला त्यांचा इतिहास आणि त्यांचे नायक माहित असले पाहिजेत.
दरम्यान, काही दिवसांपुर्वी टाईम्स नाऊ समिटमध्ये कंगना राणौत हीने 2014 मध्ये देशाला खरे स्वातंत्र्य मिळाल्याचे वक्तव्य केले होते. याआधी गांधीजींना वाटीत भीक मागून स्वातंत्र्य मिळाले होते. तसेच तिने काँग्रेस हे ब्रिटीश राजवटीचे पुढचे स्वरूप असे वर्णन केले होते. वारंवार वादग्रस्त वक्तव्य करून कंगनाला चर्चेत राहणे आवडत असावे, असे म्हटले जात आहे.