मुकुंद बाविस्कर, इंडिया दर्पण वृत्तसेवा
बॉलीवुड म्हणजेच हिंदी चित्रपट सृष्टीत एकेकाळी अनेक दिग्गज अभिनेत्यांनी आपली कारकीर्द गाजविली, यात प्रामुख्याने राज कपूर, दिलीप कुमार, सुनील दत्त राजकुमार, देवानंद यांची नावे घ्यावी लागतील. यापैकी प्रसिद्ध अभिनेते सुनील दत्त यांनी एक कलाकार म्हणून बॉलिवूड मध्ये आपल्या अभिनयाने ठसा उमटविला आहे.
सुनील दत्त यांचा जन्म 6 जून 1929 रोजी पंजाबमध्ये झाला होता. तसेच अभिनयासोबतच त्यांनी चित्रपट निर्मिती आणि दिग्दर्शनातही हात आजमावला आणि सर्वच क्षेत्रात ते यशस्वी झाले. अभिनयच नव्हे, तर सुनील दत्त राज्यसभेचे खासदारही राहिले आहेत. ते मनमोहन सिंह सरकारमध्ये युवा आणि क्रीडा खात्याचे मंत्री होते. दोन वेळा खासदार बनले होते. त्यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया त्यांच्याबद्दलच्या काही खास गोष्टी..
कंडक्टरची नोकरी :
अभिनेते सुनील दत्त यांचा जन्म झेलम जिल्ह्यातील खर्डी नावाच्या गावात झाला होता. त्यांचे खरे नाव बलराज दत्त होते. सुनील दत्त यांचे बालपण खूप संघर्षमय होते. सुनील दत्त अवघ्या 5 वर्षांचे असताना त्यांचे वडील दिवाण रघुनाथ दत्त यांचे निधन झाले. वडील गेल्यानंतर आई कुलवंती देवी यांनीच त्यांना लहानाचे मोठे केले. यानंतर सुनील दत्त उच्च शिक्षणासाठी मुंबईत आले. त्यांनी जय हिंद महाविद्यालयात प्रवेश घेतला. पण, आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने, त्यांनी मुंबई बेस्ट बसमध्ये कंडक्टरची नोकरी स्वीकारली.
राजकारण :
सुनील दत्त यांनी आपल्या मनोरंजन क्षेत्रातील करिअरची सुरुवात रेडिओपासून केली होती. ते रेडिओ ‘सिलोन’मधील सर्वात प्रसिद्ध हिंदी निवेदक होते. पण, त्यांना नेहमीच अभिनेता व्हायचे होते. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी हिंदी चित्रपटात काम करण्याचा निर्णय घेतला. सुनील दत्त यांनी 1955मध्ये ‘रेल्वे प्लॅटफॉर्म’ या चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. ‘मदर इंडिया’ या चित्रपटात सुनील यांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती. या चित्रपटाने त्यांना स्टार बनवले. त्यांना 1964 मध्ये ‘मुझे जीने दो’ या डाकूंच्या जीवनावरील चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. सुनील दत्त राजकारणातही सक्रिय होते. मनमोहन सिंह सरकारच्या कार्यकाळात ते युवा आणि क्रीडा खात्याचे मंत्री होते.
नर्गिस सोबत प्रेमकहाणी
नर्गिस दत्त आणि सुनील दत्त यांची प्रेमकहाणी ‘मदर इंडिया’ या चित्रपटाच्या सेटवर सुरू झाली होती. ‘मदर इंडिया’च्या सेटवर आग लागल्याने नर्गिसला वाचवताना सुनील दत्त गंभीर जखमी झाले होते. तिथून दोघांच्या प्रेमाला सुरुवात झाली. नर्गिस जेव्हा शेवटच्या क्षणी कॅन्सरशी लढत होत्या, तेव्हा सुनील दत्त पूर्णवेळ त्यांच्यासोबत होते.
नर्गिसशी अशी झाली भेट
सुनील दत्त सिलोन रेडिओमध्ये रेडिओ जॉकी म्हणून काम करायचे. नर्गिस त्या काळात प्रसिद्ध अभिनेत्री होत्या. एकदा नर्गिस एका मुलाखतीसाठी रेडिओ स्टेशनवर आली होती आणि तिला पाहून सुनील इतके घाबरले की, ते काही विचारू शकत नव्हते. त्या काळात सुनीलला नर्गिस आवडत असे. यानंतर दोघे ‘दो बिघा जमीन’च्या सेटवर भेटले. सुनील दत्त तिथे काही काम विचारण्यासाठी आले होते आणि नर्गिस कोणालातरी भेटायला आल्या होत्या. त्यानंतर नर्गिसने त्यांना पाहून ओळखले.
सेटवरील आग
दोघेही ‘मदर इंडिया’ चित्रपटात एकत्र दिसले, ज्यामध्ये सुनील दत्त यांनी नर्गिसच्या मुलाची भूमिका साकारली होती. ‘मदर इंडिया’चे शूटिंग सुरू होते आणि त्यात नर्गिस एका सीनसाठी लागलेल्या आगीत आडकली होती. यावेळी सुनील दत्तने जीवाशी खेळून त्याला वाचवले, मात्र ते स्वत: भाजले होते. यानंतर नर्गिस त्याला हॉस्पिटलमध्ये भेटायला यायची आणि तेव्हाच सुनील दत्तने तिच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. त्याने नर्गिसला प्रपोज केले आणि तिनेही होकार दिला. त्यानंतर दोघांनी 1958 मध्ये गुपचूप लग्न केले.
राज कपूर :
सुनील दत्त आणि नर्गिसच्या लग्नाची बातमी जेव्हा राज कूपरला मिळाली तेव्हा ते दुःखी झाले. खरे तर सुनीलच्या आधी नर्गिसचे राज कपूरवर प्रेम होते, पण त्यांचे लग्न झाले होते आणि त्यांना मुलेही होती. दोघे नऊ वर्षे रिलेशनशिपमध्ये होते, पण जेव्हा नर्गिसला समजले की राज आपल्या पत्नीला सोडू शकत नाही, तेव्हा त्यांनी आपले नाते संपुष्टात आणले. त्यानंतरच ती सुनील दत्तला भेटली आणि त्याच्या प्रेमात पडली. पण राज कपूर यांचा यावर विश्वास बसत नव्हता. हे स्वप्न नाही हे समजावे म्हणून ते सिगारेटने स्वतःला चटके देत असत.
कॅन्सर उपचार :
सन 1981 मध्ये नर्गिसला कॅन्सर झाल्याचे निदान झाले होते, पण सुनील दत्त यांना हे खूप नंतर कळले, कारण नर्गिस यांना हे सांगायचे नव्हते. दोघांचेही एकमेकांवर खूप प्रेम होते आणि सुनीलला हे कळताच तो त्यांना परदेशात घेऊन गेला. कॅन्सरमुळे नर्गिसला खूप वेदना होत होत्या आणि ती लाईफ सपोर्ट सिस्टीमवर होती. डॉक्टरांना तिच्या जगण्याची कोणतीही आशा दिसली नाही. अशा परिस्थितीत त्यांनी सुनील दत्तला नर्गिसची लाईफ सपोर्ट सिस्टीम काढून टाकण्यास सांगितले, मात्र सुनील अजिबात सहमत नव्हते. सर्वोतोपरी प्रयत्नांना न जुमानता नर्गिसचे वयाच्या ५१ व्या वर्षी ३ मे १९८१ रोजी निधन झाले.
शेवटचा चित्रपट :
सुनील दत्त शेवट ‘मुन्ना भाई एमबीबीएस’ या चित्रपटात दिसले होते. हा चित्रपट सन 2003 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात त्यांचा मुलगा संजय दत्त मुख्य भूमिकेत होता. या चित्रपटात सुनील यांनी संजयच्या वडिलांची भूमिका साकारली होती. 25 मे 2005 मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.