इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – बॉलीवूडमधील कलाकार हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या प्रकारात अडकलेले असतात. सातत्याने चर्चेत राहण्यासाठी हे केले जात असेल असे आपण मानून चाललो तरी त्यातील अनेक प्रकरणे मात्र त्यांच्या अंगलट येताना दिसतात. अभिनयापेक्षा वादांमुळे चर्चेत असलेला असाच एक अभिनेता म्हणजे अरमान कोहली. गेला काही काळ तो सातत्याने वेगवेगळ्या प्रकरणांमुळे वादात आहे. आता पुन्हा एकदा अशाच एका प्रकरणामुळे त्याच्यावर तुरुंगात जायची वेळ आली आहे.
काय आहे कारण?
आपल्या पूर्वाश्रमीच्या गर्लफ्रेंडला मारहाण केल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने अरमान कोहलीला दोन पर्याय दिले आहेत. एकतर एक्स गर्लफ्रेंडला ५० लाख द्यायचे नाहीतर तुरुंगात जायचे असे दोन पर्याय न्यायालयाने त्याच्यासमोर ठेवले आहेत. हे फारच जुने म्हणजे २०१८ मधील प्रकरण आहे. अरमान कोहलीची एक्स गर्लफ्रेंड नीरू रंधावाने त्याच्यावर केस दाखल केली होती. त्या प्रकरणीच मुंबई उच्च न्यायालयाने अरमान कोहलीला दोन पर्याय दिले आहेत. या प्रकरणी अरमान कोहलीचे म्हणणे समोर आलेले नाही. मात्र, कोर्टाने त्यांचा निर्णय घेण्यासाठी १८ जुलैपर्यंत वेळ दिला आहे. नीरू रंधावाने २०१८ मध्ये अरमान कोहलीविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यावेळी अरमानला कलम ३२३, ५०४ आणि ५०६ कलमअंतर्गत अटक करण्यात आली होती.
नीरूचे म्हणणे काय?
तक्रारीत नीरूने सांगितले होते की, ती आणि अरमान तीन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. दोघे मुंबईतील सांताक्रूझ फ्लॅटमध्ये लिव्ह इनमध्ये राहत होते. एकत्र राहत असतानाच एकदा अभिनेत्याने तिला पायऱ्यांवरून खाली ढकलले आणि तिचे डोके भिंतीवर आदळले. याप्रकरणी कोर्टाने अरमान कोहलीला असे एफिडेवेट सादर करण्यास सांगितले होते की, तो असे पुन्हा करणार नाही आणि नीरूला 50 लाख रुपये देईल. पण अभिनेत्याने तसे केले नाही. याच प्रकरणी पुन्हा नीरूने न्यायालयात धाव घेतली आहे. यावेळी मात्र अरमानने पैसे थकवले आणि कोर्टाच्या निर्णयाचं पालन केलं नाही तर मात्र त्याला तुरुंगाची हवा खावी लागणार आहे.