इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देव यांनी शनिवारी तडकाफडकी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. बिप्लब कुमार देव यांच्या अचानक राजीनाम्याच्या वृत्ताने राष्ट्रीय राजकारणात खळबळ उडाली आहे. त्रिपुरामध्ये बिप्लब कुमार देव यांची प्रतिमा भाजपचे मोठे नेते अशी आहे. अलीकडेच बिप्लब कुमार देव यांनी दिल्लीत गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती.
पक्ष नेतृत्वाच्या सांगण्यावरून बिप्लब कुमार देव यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचे समजते. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी संध्याकाळी त्रिपुरामध्ये भाजप आमदारांची बैठक होणार असून त्यात नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावावर निर्णय घेतला जाणार आहे. भाजप नेतृत्वाच्या वतीने केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव आणि भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे हे निरीक्षक म्हणून बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना बिप्लब कुमार देव म्हणाले की, पक्ष प्रत्येक गोष्टीपेक्षा मोठा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मी पक्षासाठी काम केले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि तत्कालीन मुख्यमंत्री या नात्याने मी त्रिपुरातील जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न केला. राज्यात शांतता, सुरक्षा आणि विकासाची हमी देताना मी कोरोनाच्या काळात राज्याला त्याच्या प्रभावापासून मुक्त ठेवण्याचा प्रयत्न केला. आपल्या राजीनाम्याबाबत ते म्हणाले की, सर्व काही ठराविक वेळेसाठीच येते. आम्हीही त्या निर्धारित वेळेत काम करतो. मला मुख्यमंत्री म्हणून किंवा इतर कोणत्याही पदावर कुठेही पाठवले तर मी त्यासाठी तयार आहे.
त्रिपुरामध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होत असून बिप्लब कुमार देव यांच्या राजीनाम्याकडे राज्यातील भाजपचा आणखी एक प्रयोग म्हणून पाहिले जात आहे. गुजरात, कर्नाटक आणि उत्तराखंडच्या निवडणुकांपूर्वी मुख्यमंत्री बदलण्याचा प्रयोग भाजपने केला आहे.